‘हा नरेंद्र मोदींचा भारत.. बदला घेणार’, पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना अमित शहांचा संदेश

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत दहशतवाद्यांना कडक इशारा दिला आहे. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना शहा म्हणाले, “हा नरेंद्र मोदींचा भारत आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला घेणार, एका-एका दहशतवाद्याला पकडून ठार करणार. त्यांनी युद्ध जिंकले असे समजू नये. ही लढाई अजून संपलेली नाही.” त्यांनी भारतातून दहशतवादाचा समूळ नायनाट करण्याचा संकल्प व्यक्त केला.
शहा यांनी सांगितले की, या लढाईत केवळ १४० कोटी भारतीयच नव्हे, तर संपूर्ण जागतिक समुदाय भारताच्या पाठीशी उभा आहे. “सर्व देश एकत्र आले असून दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला पाठिंबा देत आहेत. जोपर्यंत दहशतवाद संपणार नाही, तोपर्यंत आमची लढाई सुरू राहील. या हल्ल्यामागील प्रत्येक दोषीला शिक्षा होईल,” असे त्यांनी ठणकावले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अमित शहा, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना आणि केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी पहलगाम हल्ल्यातील २६ बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी मौन पाळले. जम्मू-कश्मीरमधील या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले होते, ज्यामुळे अनेकजण जखमी झाले.
हेही वाचा – पवार आणि शिंदेनी सावध रहावे; प्रकाश आंबेडकरांनी दिला ‘हा’ सल्ला
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कठोर पावले उचलली आहेत. बुधवारी भारताने पाकिस्तानी विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली. तत्पूर्वी, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय सुरक्षा बैठकीत भारतीय लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले. या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान आणि तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख उपस्थित होते.
अमित शहा यांच्या या वक्तव्याने भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याचा निर्धार पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर एकजूट आणि देशांतर्गत कठोर कारवाई यामुळे दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी दिसून येते.