‘शिवशाही स्थापन करण्यासाठीच जनतेनं अभूतपूर्व यश दिलं, स्वराज्याचं सुराज्य करण्याची जबाबदारी आपली’; नितीन गडकरी

Nitin Gadkari : जनतेनं आपल्याला अभुतपुर्व यश दिलं आहे, ते शिवशाही स्थापन करण्यासाठी दिलं असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. युद्ध संपलेलं आहे, विजय झालेला आहे, मात्र, या विजयाने स्वराज्याचं सुराज्य करण्याची जबाबदारी आपली असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. निवडणुकीच्या जय पराजयात सर्वच असतं असं नाही. विदर्भातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निवडणूक लढले होते, त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. पण ज्यांनी त्यांचा पराभव केला ते कोणाच्या लक्षात नाहीत, मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पुर्ण विश्वाच्या लक्षात आहेत असे गडकरी म्हणाले. त्यामुळं विजयानेच लोक तुम्हाला ओळखतील असं नाही असंही नितीन गडकरी म्हणाले.
स्मार्ट शहरच नाहीतर स्मार्ट व्हिलेज देखील तयार झालं पाहिजे असे गडकरी म्हणाले. गावे ओस पडू लागली आहेत. लोक शहराकडे येत आहेत. गावातील स्थिती बिघडत चालली असल्याचे गडकरी म्हणाले. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे. हीच शिवशाही महाराष्ट्रात निर्माण झाली पाहिजे. ही जबाबादारी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाची आहे, आमदारांची आहे, सर्व जनतेची असल्याचे नितीन गडकरी म्हणाले.
हेही वाचा – भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
काँग्रेसची सत्ता गेली एवढच नाहीतर, जर आपण काहीच केलं नाहीतर लोक आपल्याला विचारतील की त्यांनी काही केलं नाही तुम्ही काय केलं? जे काँग्रेस राष्ट्रवादीने केलं नाही ते आम्हाला करायचं आहे असे गडकरी म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे प्रमुख म्हणुन गडचिरोलीची जबाबदारी त्यांनी घेतली याचा मला आनंद आहे. अनेकजण नक्षलवाद सोडून नोकरी करत आहेत. पुढील पाच वर्षांत गडचिरोली सर्वात जास्त महसूल मिळवून देणारा जिल्हा असेल असेही गडकरी म्हणाले. आपल्याला फक्त स्मार्ट शहरच नाहीतर स्मार्ट व्हिलेज देखील झाली पाहिजेत असेही नितीन गडकरी म्हणाले.
महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजूर अडचणीत आहे. त्यासाठी कल्याणकारी योजना राबवणं गरजेचं आहे. चांगल्या योजना राबवल्या तर ते कशाला शहराकडे येतील असे गडकरी म्हणाले. राष्ट्राच्या प्रगतीचा सार्वांगिण विचार हा भाजपच्या विचाराचा आत्मा असल्याचे गडकरी म्हणाले. आपण सत्तेत आलो आहोत, सत्तेच्या माध्यमातून आपल्याला परिवर्तन करायचे आहे.शेतकरी शेतमजुरांचं कल्याण करायचे आहे. त्यासाठी सुशासन आणि विकास हे आपलं मिशन असल्याचे नितीन गडकरी म्हणाले.





