श्री दत्त मंदिर, संभाजीनगर येथे गुरुदत्त सेवा मंडळाचा रोप्यमहोत्सवी वर्धापन दिन उत्साहात
भक्तिरसात न्हालेला सोहळा, हजारों भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग
संभाजीनगर: गुरुदत्त सेवा मंडळ आयोजित, श्री दत्त मंदिर, संभाजीनगर येथील २५ वा रोप्यमहोत्सवी वर्धापन दिन सोहळा अत्यंत भक्तिमय आणि दिव्य वातावरणात, भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने अत्यंत यशस्वीपणे पार पडला.
सकाळच्या सत्रात श्री टेंबे स्वामी महाराज (श्री क्षेत्र नारायणपूर) यांच्या पावन उपस्थितीत भव्य रथयात्रा आणि शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. आकर्षक सजावट असलेल्या रथातून महाराजांची मिरवणूक काढण्यात आली. या यात्रेत टाळ-मृदंग, भजन मंडळे, आणि मोठ्या संख्येने महिला-पुरुष भाविक सहभागी झाले होते. यात्रेच्या मार्गावर संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालेला दिसून आला.
यानंतर दत्त मंदिर प्रांगणात पार पडलेल्या मार्गदर्शन सत्रात श्री. भारत नाना क्षिरसागर (श्री क्षेत्र नारायणपूर) यांनी उपस्थितांना मनोज्ञ आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले. लहान बालकांमध्ये अध्यात्म, संस्कार व भक्तीभाव रुजवण्याचे मोलाचे विचार त्यांनी मांडले. त्यांच्या विचारांनी श्रोते भारावून गेले.
कार्यक्रमादरम्यान, अनेक मान्यवरांचा श्री महाराजांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. सर्वांनी गुरुदत्त सेवा मंडळाच्या कार्यशैलीचे आणि सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे मनापासून कौतुक केले.
दुपारच्या सत्रात विधीवत यज्ञ व होम-हवन सोहळा पार पडला. वैदिक मंत्रोच्चारात, आर्तिके भक्तिभावपूर्ण वातावरणात हा सोहळा अधिक मंगलमय ठरला. भाविकांनी श्रद्धेने सहभागी होत, श्री दत्तमहाराजांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. हा संपूर्ण कार्यक्रम गुरुदत्त सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांमुळे आणि परिसरातील भक्तांच्या एकत्रित सहभागामुळे एक अविस्मरणीय अध्यात्मिक पर्वणी ठरली. हजारों भाविकांनी लाभ घेतलेला हा दिव्य सोहळा, दत्तभक्तीच्या परंपरेत एक उजळलेला क्षण ठरला.
दत्तभक्तीची प्रगतीशील परंपरा जपणारा एक आदर्श उपक्रम
गुरुदत्त सेवा मंडळाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला २५ वा वर्धापन दिन सोहळा हा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून, दत्तभक्तीच्या प्रगतीशील परंपरेचे दर्शन घडवणारा एक आदर्श उपक्रम ठरला. अध्यात्म, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम या सोहळ्यात पहावयास मिळाला. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील भाविकांचा सक्रिय सहभाग ही दत्तसंप्रदायाच्या वाढत्या प्रभावाची साक्ष आहे. गुरुदत्त सेवा मंडळाने यानिमित्ताने समाजात अध्यात्मिक जागृती घडवण्याचे जे कार्य केले आहे, ते निश्चितच इतर संस्था-संघटनांसाठी प्रेरणादायी आहे.





