ताज्या घडामोडीलोकसंवाद - संपादकीय

आपण ठाकरे,लाडके भाऊ, महापालिकेला एकत्र येऊ!

पूर्वी, हिंदी सिनेमांमध्ये एक हमखास ‘थीम’ असायची.. जत्रेमध्ये दोन भाऊ हरवले.. एक श्रीमंताच्या घरात पोहोचला, तर दुसरा गरीबाच्या ! मग एकाचे जीवन ऐश्वर्यात तर दुसऱ्याचे हलाखीत..मग, ट्रॅजेडी कॉमेडी रोमान्स..आणि शेवटी दोघं एकत्र येऊन गोड शेवट ! या ‘थीम’ वर शेकडो चित्रपट चालले आणि गाजलेही.. अगदी ‘वक्त’ पासून ते ‘यादों की बारात’ पर्यंत ! त्या काळात विभक्त होण्यासाठी काहीही कारणं चालायची.. भूकंपासारखी नैसर्गिक संकटंही मदतीला यायची !

साद आणि प्रतिसादाचं पाऊल !

आता आधुनिक जगात समोर आली आहे तीच ‘थीम’.. राजकारणात विभक्त होऊन पुन्हा एकत्र येण्याची शक्यता असलेल्या लाडक्या भावांची ! एकानं साद घातली आहे, दुसऱ्यानं प्रतिसाद दिला आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेची संपूर्ण धुरा एकटे राज ठाकरे सांभाळायचे. पण, नंतर उद्धव ठाकरेंनी मैदानात उडी घेतली..वंदनीय बाळासाहेबांनी उद्धव यांच्या नेतृत्वाला ग्रीन सिग्नल दिला, अन बाहेर पडून राज ठाकरेंना नवीन पक्ष काढावा लागला..हा इतिहास अगदी ताजा आहे ! गेले दोन दिवस मराठी मीडियाला चर्चेसाठी दुसरा विषय नाही याचं खरं आश्चर्य वाटतंय..!

एकाकडे वीस आमदार एकाकडे शून्य..

मूळ शिवसेनेच्या उबाठा गटाला विधानसभा निवडणुकीत फक्त २० जागा मिळाल्या आहेत आणि राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाला एकही जागा नाही, अशा दोन पक्षांचे नेते आपले मतभेद विसरुन एकत्र येणार, अशी नुसती चर्चा झाली, त्याची भलीमोठी बातमी करण्याचे प्रयोजन लक्षात येत नाही. अजून कशात काही नाही, लग्न करायचे की नाही हे ठरलेले नाही आणि पोराचे नाव ठेवण्याची तयारी सुरु झाली आहे. मीडियासाठी दीनानाथ, वक्फ बोर्ड यापेक्षा वेगळी बातमी सापडली म्हणून असेल कदाचित, पण दोन भावांच्या मनोमीलनाला मीडियाने अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे हे खरं..

वंदनीय बाळासाहेबांचे स्थान अढळ !

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्थान वादातीत आहे, हे प्रत्येकाला मान्य आहेच. मराठी माणसाच्या हितासाठी त्यांनी केलेला संघर्ष इतिहासाची पानेच्या पाने लिहून गेला आहे. पण, आता एक तप होऊन गेले, बाळासाहेब हयात नाहीत. शिवसेना त्यांचे चिरंजीव उद्धव यांच्या हाती आली. आता, त्या पक्षाचे देखील दोन भाग झाले. त्यातील अधिकृत भाग एकनाथ शिंदे घेऊन गेले, आणि उद्धव यांच्याकडे एक गट राहिला.

हेही वाचा –  पुण्यात पिंक ई-रिक्षा वाटप कार्यक्रम; अजित पवारांनी पुरुष प्रवाशांचे फोटो काढण्याचा महिलांना दिला सल्ला

राज ठाकरे यांचा सवता सुभा

वंदनीय बाळासाहेबांनी आपले चिरंजीव उद्धव यांना आशीर्वाद दिल्यामुळे आपल्याला शिवसेनेत फारसे स्थान नाही, हे लक्षात घेऊन राज ठाकरे यांनी वेगळा पक्ष काढला होता. त्या पक्षामुळे २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा या दोघांचेही नुकसान झाले. राज ठाकरे यांची भाषणे प्रभावी असतात. त्यामुळे पुण्यात बारा वर्षांपूर्वी मनसे महानगरपालिकेत सर्वात मोठा आणि नंतर विरोधी पक्ष झाला होता. नाशिक महानगरपालिकेत मनसेची सत्ता आली होती. पण, काळाच्या ओघात मनसे पुन्हा मागे पडली, तो भाग वेगळा !

उद्धव यांचे घालीन लोटांगण..

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी सगळा पक्ष आणि होती ती पुण्याई पणाला लावली. पण, पाच वर्षांत गोळाबेरीज काय झाली, याचा हिशेब अजून करता आला नाही. त्यांना अडीच वर्षे मुख्यमंत्री होता आले आणि आपल्या मुलाला मंत्री करता आले एवढेच. पण त्यासाठी त्यांना हिंदुत्व, स्वाभिमान, वंदनीय साहेबांचा कणखरपणा सोडावा लागला आणि थेट दोन्ही काँग्रेसपुढं जाऊन लोटांगण घालावं लागलं!

झाकली मूठ केव्हाच उघडली !

वंदनीय बाळासाहेब यांनी मुख्यमंत्री होण्याचे ठरविले असते तर त्यांना काहीच अशक्य नव्हते. पण, त्यांची आपले स्थान आणखी उंचीवर नेऊन ठेवले. आता, एक लक्षात घ्यायला हवे की वंदनीय बाळासाहेब यांची उंची त्यांचे पुत्र किंवा पुतण्या यांना गाठणे शक्य आहे का? याचे कारण म्हणजे दोघांनी आपली झाकली मूठ उघडली आहे. आदित्य आणि अमित या दोघांना निवडणुकीच्या रिंगणात आणणे, स्वतः उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत सदस्य राहणे इत्यादी बाबी लक्षात घेतल्या तर पुढे वाढवून ठेवलेल्या राजकीय अडचणी लक्षात येतील.

उद्धव ठाकरे यांचे भांडवल बघा..

एका बाजूला अत्यंत कमकुवत झालेल्या दोन काँग्रेस पक्षांबरोबर चुंबाचुंबी आणि दुसरीकडे तगड्या भाजपाशी वैर एवढ्या किरकोळ भांडवलावर उद्धव ठाकरे आपला पक्ष कसा वाढवणार, हा मोठा प्रश्न आहे. मराठी अस्मिता ही मुख्यतः काँग्रेस पक्षाच्या विरोधात होती. महाराष्ट्रातील भाजपाला दिल्लीतून लादलेला पक्ष असे मानले जात नाही. अशा परिस्थितीत वंदनीय बाळासाहेब यांच्या काळात जे मुद्दे प्रभावी होते, ते आता ठाकरे बंधू पहिल्यापासून उपस्थित करणार आहेत का, हा महत्वाचा प्रश्न असून त्यांचा प्रभाव कितपत पडेल, हे पाहणे उचित ठरेल!

मीडियातून फक्त चर्चा आणि चर्चाच..

सध्या तरी मीडियाच्या माध्यमातून नुसती चर्चा सुरू आहे एवढेच. प्रत्यक्षात, हे दोघे भाऊ समोरासमोर आलेले नाहीत किंवा त्यांच्यात प्रत्यक्ष संपर्क झालेला नाही, हे लक्षात घ्यायला हवे! ज्या कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना वाटते की या दोघांनी एकत्र यावे, त्यांच्या मुलाखती किंवा डिबेट विविध वृत्तवाहिन्यांवर सुरू आहे, एवढेच !

दोन्ही नेते म्हणतील, ती पूर्व दिशा..

दुसरीकडे, असे ऐक्य आणि संयुक्त काही उपक्रम करणे सोपे नाही. कारण, दोनही पक्षांचे नेते ‘मी म्हणेन ती पूर्व दिशा’ मानणारे आहेत, एवढे लक्षात घेतले तरी पुरे. दोघांनाही मानणारा वर्ग महाराष्ट्रात काही प्रमाणात आहे. काही चांगले होत असेल तर लोक आपोआप मागे येतील, याची या दोघांना आणि जनतेला खात्री आहे ! पण, मूळ शिवसेनेतून राज ठाकरे फुटल्यापासून त्यांनी उद्धव यांच्यावर केलेले आरोप कार्यकर्ते विसरलेले नाहीत.. राज ठाकरेही विसरले नसणार !

आरोपांचे तोफगोळे विसरतील?

शिवाय उद्धव यांच्या डाव्या-उजव्या हातांनी आरोपांचे उडवलेले तोफगोळे, राजे यांना घालून पाडून मारलेले डायलॉग आणि अनेकदा त्यांची उडवलेली खिल्ली.. मनसैनिक कसा विसरेल ? नेमका तोच प्रकार उद्धव ठाकरे यांच्याबाबतही आहे..राज यांनी उद्धव ठाकरे यांची फोडलेली काही गुपिते जिव्हारी लागणारी होती..त्यांनी वेळोवेळी केलेल्या नकला आणि राज स्टाईल चे डायलॉग हे ही सहन करण्यापलीकडचे होते..हे सगळे विसरून दोघांनी एकत्र येऊ, असे म्हणणे सध्या तरी शक्य वाटत नाही. दोघांनी एकत्र यावे, ही जनतेची कितीही इच्छा आहे, असे वरवर कोणी म्हणत असेल, तर गाजराची पुंगी वाजवण्यासारखे आहे, असे आत्ता तरी वाटते. बघू या.. घोडा मैदान जवळच आहे, सध्या दोघांच्या एकत्र येण्याला शुभेच्छा देऊ या !

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button