उपविभागीय अधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा अतिविशाल मोर्चा
समाजाची ५.५% आरक्षणाची मागणी, हजारो महिला-पुरुष सहभागी
नांदेड : मराठा समाजाला ओबीसी आरक्षणासाठी राज्य शासनाने हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेतल्याच्या निर्णयानंतर, तेलंगणा व आंध्र प्रदेशात अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट असलेल्या बंजारा समाजालाही महाराष्ट्रातही तोच दर्जा लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याच मागणीसाठी गुरुवार (ता. १८) उपविभागीय अधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा अतिविशाल मोर्चा काढण्यात आला.
कलावती गार्डन येथून निघालेला हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोचला. येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या मोर्चात हजारो महिला-पुरुष, युवक-युवती पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. सहभागींच्या हातात फलक, ‘जय सेवालाल’च्या पांढऱ्या पताका, तसेच, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, संत सेवालाल महाराज आणि दिवंगत माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या प्रतिमा होत्या. लेंगी नृत्याचे पथक आणि घोषणाबाजीमुळे मोर्चा अधिकच आकर्षक ठरला.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
मोर्चाचे झाले सभेत रूपांतर
मोर्चाचे सभेत रूपांतर झाले तेव्हा मंचावर राज्यभरातील बंजारा नेते, आमदार, खासदार, माजी आमदार, विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला नेत्या आणि तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी खासदार हरिभाऊ राठोड, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश राठोड, माजी खासदार रवींद्र राठोड, बेबी नाईक, बंजारा क्रांती दलाचे संदेश राठोड यांच्यासह अनेक मान्यवरांनी भाषण करत हैदराबाद गॅझेटियर महाराष्ट्रातही लागू करण्याची मागणी केली.
तसेच, समाजाने न्यायमूर्ती बापट आयोगाच्या शिफारशींची त्वरित अंमलबजावणी करण्याची आणि स्वतंत्र डी-नोटिफाइड ट्राइब म्हणून ५.५ टक्के आरक्षण देण्याची मागणी ठामपणे मांडली. प्रास्ताविक घनश्याम राठोड यांनी केले. सूत्रसंचालन ज्योती आडे, दुर्गादास राठोड यांनी, तर आभार राहुल नाईक यांनी मानले पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
महिला झाल्या भावुक
सभेत दिवंगत प्रदीप नाईक यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करत जयघोष करण्यात आला. तेव्हा अनेक महिला भावूक झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. पोलिस प्रशासनाच्या दक्षतेमुळे हा मोर्चा शांततेत पार पडला. मोर्चात किनवट व माहूर तालुक्यातील हजारो बंजारा समाजबांधव सहभागी झाले होते. यामध्ये महिला व युवकांचा सहभाग लक्षणीय होता.





