अध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडी

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रवचने

मी भगवंताचा आहे ही अखंड जाणीव ठेवावी.

आपल्याला काही हवे असे वाटले आणि ते तसे झाले नाही, म्हणजे तळमळ लागते. परंतु सर्व परमात्माच करतो आहे असे मानले, म्हणजे काळजीचे कारण उरत नाही. आपण ‘ देव आहे’ असे म्हणतो, पण आपला तो खरा विश्वास आहे का ? एखादा मनुष्य बुडायला लागला, म्हणजे दगड जरी त्याच्या हाताला लागला तरी हा आपल्याला तारील असा त्याला विश्वास वाटतो, आणि तो त्याला धरून आपणही त्याच्या बरोबर बुडतो. म्हणून म्हणतो, ‘ देव आहे ’ असा आपला खरा विश्वास नसतो, आपण नुसते तोंडाने म्हणतो एवढेच ! नाही तर आपल्याला काळजी का वाटावी ? प्रत्यक्ष देव पुढे उभा राहिला तरी आपल्यामागची काळजी आणि सुखदु:खे संपणार नाहीत. याचे कारण म्हणजे, परमेश्वरावरचा आपला विश्वासच डळमळीत असतो. वास्तविक, परमेश्वराची इच्छा प्रमाण मानल्यावर सुखदु:ख मानण्याचे कारण नाही. परमेश्वर सर्वव्यापी आहे.

हेही वाचा –  वेळेच्या आठ दिवस आधीच मोसमी पाऊस दाखल; गेल्या १६ वर्षांत भारतात सर्वात लवकर आगमन

तो जसा माझ्यात आहे, तसा दुसऱ्यातही आहे; म्हणून, दुसऱ्याने काहीही केले तरी आपल्याला त्याबद्दल काही वाटण्याचे कारण नाही. तरी अशी भावना ठेवून वागावे की, मी देवाचा आहे, तो माझा पाठीराखा आहे, आणि म्हणून काही झाले तरी मला काळजी करण्याचे कारण नाही. हे सर्व नामस्मरण केल्याने साधते. म्हणून, मी आजपासून सतत नामस्मरण करीत राहणार असा निश्चय करावा, आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू ठेवावा. परमेश्वराला शरण जाऊन ‘ मला तसे वागण्याची बुद्धी द्यावी’ म्हणून त्याची प्रार्थना करावी. मनाला पहिल्याने थोडी बळजबरी करावी लागेल. लहान मुलांना शाळेत जाण्याकरिता सुरुवातीला थोडी बळजबरी करावी लागते. मुलीला प्रथम सासरी पाठवितानाही तसेच करावे लागते. आपण थोडा तरी नियम करावा; उदाहरणार्थ, जेवायच्या आधी, रात्री निजताना, सकाळी उठताना, नाम घ्यायचेच; भगवंताची आठवण करायचीच. असे केले तर ते आयुष्यात फार उपयोगी पडेल. प्रपंचाचा प्रयत्न आज जो चालू आहे तसाच करीत जावा, पण ‘ मला भगवंत हवा ’ असे म्हणत जावे. मनामध्ये भगवंताची आस ठेवावी, म्हणजे ती हळू हळू वाढत जाईल, आणि तिचे पर्यवसान ध्यासामध्ये होईल. समजा, एखाद्या माणसाला घर बांधायचे आहे; ‘ मला घर बांधायचे आहे ’ असे तो म्हणत जातो, आणि त्यासाठी पैसे शिल्लक टाकतो. दागिने करायची वेळ आली तर ते नको म्हणतो, कारण पुढे घर बांधायचे आहे. हे जसे खरे, त्याचप्रमाणे ‘ भगवंत मला हवा ’ असे नुसते म्हणत गेल्याने देखील मनुष्य निव्वळ प्रपंचातच गुरफटून न जाता, विषय बेताने भोगेल. खरा ध्यास लागल्यावर, ती वस्तू मिळाल्यावाचून चैन पडणारच नाही.

बोधवचन:- ज्याचा भगवंतावर विश्वास, त्याला समाधान खास !

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button