ताज्या घडामोडीलोकसंवाद - संपादकीय

संजय,विजय,पटोलेंचे नाना, भाजपाच्या नावानं ठणाणा !

विरोधकांना अजूनही म्हणावा तसा सूर सापडलेला नाही. विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात आणि लोकसभा निवडणुकीनंतर देशभरात विरोधी पक्षांमधील वातावरण बेसूर आणि भरपटलेलेच आहे.

लोकसभेत भाजपाचे स्वप्न भंगले..

लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला चारशे पेक्षा जास्त जागा मिळवू न देण्यामध्ये विरोधकांना यश आले होते. त्यानंतर सत्तारूड म्हणजेच भाजपाची बाजी विधानसभा निवडणुकीमध्ये पलटेल आणि महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी, उबाठा सेना यांना किमान समाधानकारक जागा मिळतील अशी आशा त्यांच्या नेत्यांमध्ये निर्माण झाली होती. परंतु, लाडक्या बहिणींनी केलेल्या मतदानामुळे विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळाले. आता हवा गेलेल्या फुग्याप्रमाणे त्यांची अवस्था झाली आहे.

पवार गट संयमी, इतरांचा थयथयाट !

शरद पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत बऱ्यापैकी संयमाची भूमिका घेतली आहे. शारीरिक आणि मानसिक धकव्यामुळे कदाचित सध्या ते शांत असावेत, मात्र, ही शांतता आणि धारण केलेले मौन एका अर्थाने त्यांच्या दृष्टीने पचनी पडणारे आहे..पडलेले आहे !

रोजची बडबड, तोंडाच्या वाफा..

काँग्रेस आणि उबाठासेना यांना मात्र संयम नावाचा शब्द आणि भावना, कृती असते याचा पूर्ण विसर पडला आहे. दररोज काही ना काही बडबडल्याशिवाय तोंडची वाफ दवडल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. साहजिकच, ते जेवढे बडबडतील तेवढा लाभ भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांना होणार आहे. विजय वडेट्टीवार, नाना पटोले किंवा नव्याने प्रदेशाध्यक्ष झालेले हर्षवर्धन सपकाळ ही सर्व मंडळी एकाच धाग्यात गुंतल्यामुळे ‘एका माळेचे मणी’ वाटू लागले आहेत. या तिघांमध्ये कमालीचे वैचारिक साम्य आणि वाचिक समता आहे. कोणते वाक्य कोण बोलले, हे समजू नये इतके बेमालून, एकरूप विचार या तिघांचे आहेत. त्यामुळे एकाला झाकावे आणि दुसऱ्याला काढावे, असे म्हणण्यापेक्षा सगळ्यांनाच उघडे ठेवले तरी फरक पडणार नाही अशी काँग्रेसची अवस्था आहे.

जुन्या नेत्यांच्याकडे धुरा हवी होती..

जुन्या जाणत्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर हा त्यातल्या त्यात बरा पर्याय काँग्रेसकडे होता. त्याचबरोबर सतेज पाटील यांच्याकडे काँग्रेसची धुरा देणे योग्य झाले असते आणि गेला बाजार पक्षातील एकमेव समंजस नेता पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष केले असते, तर किमान दररोज ही मंडळी ज्या प्रकारे तोंडची वाफ घालवत आहेत, ती सर्वसामान्यांना सहन करावी लागली नसती. आक्रमक प्रचार आणि बेताल वक्तव्य यातला फरक विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांना आज अखेर समजलेला नाही.

हेही वाचा   :  ‘आम्ही फक्त पायलट-को-पायलट बदललो’; उपमुख्यमंत्री शिंदेंचा ‘खुर्ची’ वरून टोला

वडेट्टीवारांचा हाच का पुरुषार्थ ?

मंगेशकर कुटुंबीय वडेट्टीवार यांचे देणे लागत असल्याप्रमाणे वडेट्टीवारांनी ज्या प्रकारे त्या कुटुंबावर आरोप केले, ते निषेधार्थ आहेतच. परंतु वाटेल ते बोलण्यामध्ये पुरुषार्थ आहे, असे मानणाऱ्या वडेट्टीवार यांना हे समजून कोण सांगणार आणि ते स्वतः समजून कधी घेणार? या तिघांचा अर्क संजय राऊत हे उबाठासेनेचे खासदार प्रवक्ते आहेत. खरे तर संजय राऊत यांच्याविषयी काही लिहावे, बोलावे असा विषय राहिलेला नाही. आपण काय बोलतो, त्याचे भूत, भविष्यकाळातील संबंध, परिणाम काय आहेत, याचा विचार ते करतच नसल्याने त्यांचे दररोजचे त्यांच्या पक्षासंदर्भातले आणि सत्तारूढ पक्षसंदर्भातले विचार हास्यास्पद असतात, हे सगळ्यांना मान्य आहेच !

उबाठाची अवस्था अत्यंत केवीलवाणी..

संभाजीराजे छत्रपती आणि शाहू महाराज छत्रपती यांचा अपमान भारतीय जनता पक्षाने केला, असे सांगताना ते संभाजी महाराज छत्रपती यांनी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात केलेली विधाने जाणीवपूर्वक विसरतात. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे छत्रपती यांचा केलेला अपमान ते झाकून ठेवतात. एवढेच नव्हे तर राज्यसभेवर उमेदवारी करत असताना संभाजीराजे छत्रपती यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाचा पाठिंबा मागितल्यावर आमच्या पक्षात आला, तर आम्ही पाठिंबा देऊ, अशी अट घालून त्यांच्यापेक्षा आपला पक्ष मोठा असल्याचे दाखवून देण्याचा विसर आठवतो का ? आणि त्यातून आपण अपमान केला आहे ही, भावना संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या गावीही नव्हती. मात्र, रायगड उत्सव समितीने संभाजीराजे छत्रपती यांना निमंत्रण दिले नाही याचे खापर ज्या पद्धतीने राऊत भाजपावर फोडत आहेत, तो प्रकारच केविलवाणा आहे.

वंशज असल्याचा पुरावा कोणी मागितला ?

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत गृहमंत्री अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा असे म्हणणारे संजय राऊत, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांना ते छत्रपती असल्याचा पुरावा मागतात. यावरून अपमानास्पद विचार आणि कृती करणारी मंडळी कोण, याचा उलगडा होतो. त्यातूनही अमित शहा यांनी दोन, तीन वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला असेल. मात्र, संजय राऊत गेले तीन दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा अमित शहा यांनी कसा एकेरी उल्लेख केला हे दाखवत दररोज डझनभर वेळा छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करतात, त्याची जाणीवही त्यांना होत नाही. हे एकीकडे गंभीर आणि दुसरीकडे अज्ञान दर्शवणारे आहे, हे सर्वांना कळते !

अडाणी, असंबद्ध, अविवेकी, अर्धवट

थोडक्यात, कॉंग्रेस आणि उबाठासेना अडाणी, असंबद्ध, अविवेकी, अर्धवट, अनाकलनीय, अतार्कीक वक्तव्य करण्याच्या कोण आघाडीवर या स्पर्धेत आहेत. खरे तर दोघांनाही या स्पर्धेत एकत्रितरीत्या विजयी घोषित केले तरी चालणारे आहे. ताळतंत्र नसलेल्या या नेत्यांच्या विचारांना मतदार जनता फारसे गांभीयनि घेत नाही आणि घेऊ ही नये. मग संजय राऊत, विजय वडेट्टीवार, हर्षवर्धन सपकाळ किंवा नाना पटोले यांच्यात सुरू असलेला ठाणाणा..याकडे सगळ्यांचे दुर्लक्ष आहे, त्याकडे लक्ष देण्यासाठी कोणालाही वेळ नाही, हेच खरे खरे!

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button