स्वच्छता सर्वेक्षणात जिल्ह्यातील ३५ ग्रामपंचायतींना दुसऱ्यांदा पिवळे कार्ड
ग्रामपंचायतींना कारणे दाखवा नोटीस
कोल्हापूर: स्वच्छता सर्वेक्षणात जिल्ह्यातील ३५ ग्रामपंचायतींना दुसऱ्यांदा पिवळे कार्ड मिळाले आहे. ही बाब गंभीर असल्याने ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई का करू नये, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी या ग्रामपंचायतींना कारणे दाखवा नोटीस दिली.
कार्तिकेयन यांनी ग्रामपंचायतींना दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, पाणी गुणवत्ता सनियंत्रण सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून शुद्ध व गुणवत्तापूर्ण पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हे प्राथमिक काम आहे.
यासाठी दरवर्षी दोनवेळा आरोग्य विभाग व ग्रामपंचायत विभागामार्फत पिण्याच्या पाण्याच्या स्रोत परिसराचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येते. एप्रिल २०२५ मध्ये पावसाळ्यापूर्वी घेतलेल्या स्वच्छता सर्वेक्षणात अनेक त्रुटी आढळल्याने काही ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड दिले होते.
१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान झालेल्या मान्सूनोत्तर स्वच्छता सर्वेक्षणात जिल्ह्यातील ५८ ग्रामपंचायतींना पुन्हा पिवळे कार्ड मिळाले आहे. त्यापैकी ३५ ग्रामपंचायती एप्रिल २०२५ सर्वेक्षणातही पिवळ्या कार्डात होत्या.
हेही वाचा – भारत-अमेरिकेत शस्त्रांसंबंधी मोठा करार ; ९३ दशलक्ष डॉलर्सच्या लष्करी पॅकेजला मंजुरी
गावागावांतील लढती आज होणार स्पष्ट
या ग्रामपंचायतींना १५ दिवसांचा वेळ दिला आहे. या वेळेत पाण्याच्या स्रोत परिसरातील त्रुटी दूर करून पिवळे कार्ड हिरव्या कार्डात रूपांतरित करावे व त्यानंतर आरोग्य विभागामार्फत फेरसर्वेक्षण करून घ्यावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
पिवळे कार्ड मिळालेल्या ग्रामपंचायती
भुदरगड : नाधवडे, गारगोटी, हणबरवाडी, मिणचे बुद्रुक व हेदवडे. चंदगड : दाटे, गुडेवाडी व बुजवडे. गगनबावडा : मुटकेश्वर. हातकणंगले : रुकडी, यळगूड, शिरोली पुलाची, टोप, भेंडवडे.
करवीर : निगवे खालसा, कुर्डू, वडकशिवाले, चुये व नांदगाव. पन्हाळा : कोलिक. राधानगरी : धामोड, बुरंबाळ, राशिवडे बुद्रुक, शेळेवाडी व टिटवे. शिरोळ : अब्दुल लाट, लाटवाडी, शिरदवाड, शिवनाकवाडी, उदगाव, कवठे गुलंद, गौरवाड, टाकळी, घोसरवाड व जुने दानवाड





