हिरव्या दहशतवादावर आता भगव्या क्षेपणास्त्रांचा उतारा !

भारताचे नंदनवन मानल्या गेलेल्या काश्मीरच्या पहलगामधील क्रूर हल्ल्याने सारा देश हादरला आहे. त्यामागे मोठे नियोजन आहे आणि त्याला पाकड्यांच्या लष्कराची साथ आहे, हे उघड सत्य आहे. या हल्ल्याचे ‘टायमिंग’ पाहता अनेक अनुत्तरित प्रश्न काय सांगत आहेत? हे लक्षात घेतले पाहिजे. दहशतवाद्यांनी हिंदू पुरुष पर्यटकांवर बेछूट गोळ्या झाडल्या आणि निष्पाप २७ जणांचा बळी घेतला.
बघा, अचूक ‘टायमिंग’ साधले..
हा हल्ला झाला, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियात, तर अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स भारत दौऱ्यावर होते. म्हणजेच, एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचे ‘टायमिंग’ दहशतवाद्यांनी आणि या हल्ल्याच्या क्रूर सूत्रधारांनी साधले आहे. यापूर्वीही काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झालेले आहेत. पठाणकोट, उरी आणि बारामुल्ला, अमरनाथ यात्रा, पुलवामा..मात्र, आताचा हा हल्ला फार महत्त्वाचा आहे.
पाकिस्तानचा पोटशूळ उठला !
या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी तत्काळ सौदी अरेबियाचा दौरा आटोपून मायदेश गाठला.. म्हणजे नियोजित गाठीभेटी आणि अनेक महत्त्वपूर्ण बाबी तसेच करार अपूर्ण राहिले. आखातातील मुस्लिम देशांचे भारताशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित होणे, त्यांच्याशी व्यापार, दळणवळण, संरक्षण अशा विविध क्षेत्रात सहयोग होणे, हे पाकिस्तानला रुचणारे नाही. त्यात मिठाचा खडा कसा टाकता येईल, भारताचे प्रयत्न कसे विफल होतील, यात त्यांना अधिक रस, तर अमेरिकन उपाध्यक्ष भारतात आले असताना हा हल्ला घडवून काश्मीरकडे संपूर्ण जगाचे लक्ष वळविणे, हा सुद्धा हेतू आहे.
सुगावा नाही, हेच आपले अपयश !
हातात अत्याधुनिक रायफल्स घेऊन पायी जाणारे दहशतवादी कुणालाच कसे दिसले नाहीत ?उन्हाळ्यात पर्यटकांनी बहरणाऱ्या या भागात दहशतवादी अचानक कसे येऊ शकतात? दहशतवाद्यांच्या रेकीचा आपल्या कुठल्याच यंत्रणेला सुगावा कसा लागला नाही ? दहशतवादी त्याच परिसरात मुक्कामाला असतील तर त्याचा थांगपत्ताही आपल्याला कसा नाही? हे सारे अपयश कुणा एकाचे नक्कीच नाही. त्यास अनेक जण जबाबदार आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक पोलीस, प्रशासन, लष्कर, गुप्तहेर खाते, निमलष्करी दल, स्थानिक नागरिक, व्यावसायिक असे सारेच.. हे सगळ्यांनीच मान्य करायला हवे!
हेही वाचा – तुमच्या वडिलांचे प्राण वाचवणाऱ्या एकनाथ शिंदेंबाबत बोलणे संस्कारात बसते का? रोहिणी खडसेंवर शिवसेनेचा पलटवार
तोंडाच्या वाफा नकोत, कृती हवी..
अशा प्रकारचा हल्ला झाला, की पाकिस्तानशी दोन हात करण्याची भाषा बोलली जाते. सर्जिकल स्ट्राईकचेही धुमारे फुटतात. मुळात हल्ल्याच्या मुळाशी जाण्याचे सोडून आपण फांद्यांकडेच पाहतो. पुलवामा हल्ल्याचेच उदाहरण घेता येईल. त्या हल्ल्यासाठी जे आरडीएक्स वापरण्यात आले ते कुठल्या मार्गाने आणि कसे आले? सैनिकांची बस त्या मार्कानेच जाणार आहे, याची माहिती दहशतवाद्यांना कशी अचूक मिळाली? प्रत्यक्ष हल्ला झाला तोपर्यंत आपल्या साऱ्याच यंत्रणा कशा झोपल्या होत्या? या सर्वाचा थांगपत्ता आजवर लागलेला नाही. किंबहुना त्यावर कुणीच बोलत नाही. त्याची चौकशी होत नाही की दोषींवर कारवाई सुद्धा ! ‘पाकव्याप्त काश्मीर घेऊनच राहू’, ‘आता पाकिस्तानला धडा शिकवू’, अशा प्रकारची प्रसिद्धीलोलुप वक्तव्ये करून काही साध्य होत नाही. याउलट बोलण्यापेक्षा आधी कृती हवी आहे.
दहशतवाद्यांचे इप्सित साध्य?
वास्तविक, ३७० कलम हटविल्यानंतर काश्मीरमध्ये शांतता आहे, तेथे विकासाची कवाडे खुली झाली आहेत, पर्यटन व्यवसाय भरभराटीस आहे, असा प्रचार सुरू आहे. ही बाब हेरूनच दहशतवाद्यांनी ऐन पर्यटन हंगामाच्या प्रारंभी हल्ला केला आहे. त्यामुळे आता पुढील काही महिने पर्यटक तेथे जाण्यास धजावणार नाहीत, याचाच अर्थ त्यांचे इप्सित साध्य होणार! या हल्ल्यामुळे काश्मीरमध्ये पुन्हा बेरोजगारी वाढण्याची भीती आहे. परिणामी माथेफिरू तरुणांना आपल्या गळाला लावणे, दहशतवाद्यांना शक्य होणार आहे.
चर्चा बास, आता मुसक्या आवळा !
दहशतवादी गटांकडून अतिशय नियोजनपूर्वक आणि थंड डोक्याने हल्ल्याला पूर्णत्व दिले जाते. मुंबई हल्ल्याच्या कटातील आरोपी तहव्वूर राणा याचे अमेरिकेतून भारतात यशस्वी प्रत्यार्पण झाले आहे. या खटल्यातून आणि त्याच्या चौकशीतून पाकचा नापाक बुरखा जगासमोर येणार आहे. त्यामुळेही पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचा जळफळाट झाला आहे. यातूनच आक्रमक होत पहलगामचा हल्ला असू शकतो. हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या नाकाबंदीसाठी भारत सरकारने पाच मोठे निर्णय घेतले. मात्र, दहशतवाद्यांचे हल्ले आपण का रोखू शकत नाही? दहशतवाद्यांच्या काश्मीरमधील मुसक्या आवळण्यासाठी नक्की काय करायला हवे? याचा सर्वंकष विचार करायला हवा.
देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका..
कुठल्याही घटना घडल्या की त्याला धार्मिक रंग देणे आणि धार्मिक भावना चेतवणे, याने देश दुभंगतो आहे, फुटीची बीजे रोवली जात आहेत, यातूनच देशाच्या अंतर्गत सुरक्षेला मोठा धोका निर्माण होतो आहे. खरे तर, अशा प्रकारच्या कुटील कारवायांवर सर्जिकल स्ट्राईक करण्याबरोबरच पाकिस्तानला आणि दहशतवाद्यांना घडा शिकवण्याचे आव्हान आहे. आपण ते कसे पेलतो, यावरच पुढील दहशतवादी हल्ले थांबणार का वाढणार, हे अवलंबून आहे !
एकदा होऊन जाऊ द्या !
पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर हाकलून आणि महत्त्वाची पाच पावले उचलून मोदी सरकारने जोरदार तयारी केली आहे. युद्धसरावही सुरू झाला आहे. त्यामुळे आता एवढेच सांगणे आहे, की आता एकदाचे होऊन जाऊ द्या. जात, धर्म, पंथ काढत बसण्यापेक्षा हा हिरवा दहशतवाद कायमचा बंद करण्यासाठी भगव्या क्षेपणास्त्रांची जुळवाजुळव महत्त्वाची आहे. वर्षानुवर्षे या हिरव्या दहशतवादाचा भारत हा मोठा बळी आहे. या जखमा मिटवायच्या असतील आणि पुन्हा होऊ नये असे वाटत असेल तर त्यावर भगवे मलम हाच जालीम इलाज आहे, हे नक्की !