‘यास’ची भीती! रेल्वेने रद्द केल्या 25 गाड्या

मुंबई – ‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या विध्वंसातून देश सावरलेला नसतानाच आता आणखी एक भयानक चक्रीवादळ ‘यास’ येत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे या वादळाची निर्मिती झाली असून पश्चिम बंगालच्या दिशेने येणारे हे वादळ भयंकर असणार आहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. या वादळाचा धोका लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने 25 गाड्या रद्द केल्या आहेत. 24 मे ते 29 मे दरम्यानच्या गाड्या रद्द करण्यात आल्या असून रेल्वेने प्रेस नोट जारी करून याबाबत माहिती दिली आहे.
भारताच्या पश्चिम भागात तौक्ते वादळाने जोरदार तडाखा दिला. होत्याचे नव्हते केले. त्यानंतर आता पूर्व भागात यासचा धोका वाढत आहे. अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी तयार झाले असून त्याचे आज ‘यास’ चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. त्यानंतर ते अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. २६ मे रोजी ते पश्चिम बंगाल आणि ओदिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.




