#CoronaVirus: मराठवाड्यातील मायक्रो इकॉनॉमीला रोज सरासरी ५० कोटींचा फटका

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोना संशयित रुग्ण आढळून येत आहेत. त्यातील बहुतांश रुग्णांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह येत असले तरी भीतीचे वातावरण कायम आहे. अशा स्थितीत दक्षता म्हणून उपाययोजना करण्यात येत असल्या तरी याचा परिणाम मायक्रो इकॉनॉमीवर दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील मायक्रो इकॉनॉमीला दररोज सरासरी ५० कोटींचा फटका बसत असल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. आगामी काळात हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जगभरात कोरोना या संसर्गजन्य विषाणूने थैमान घातले आहे. युरोप, अमेरिकेसह जगातील सर्वच देशांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या साथीपासून बचाव करण्यासाठी अनेक देशांनी उपाययोजना आखल्या असून, बहुतांश देशांनी आयात-निर्यातीसह इतर अनेक गोष्टींवर निर्बंध घातले आहेत, तसेच कोरोनाचे संशयित रुग्ण मुंबई, पुण्यापाठोपाठ मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, जालना, हिंगोली या जिल्ह्यांतही आढळून येत असल्याने याचा फटका विविध छोट्या-मोठ्या व्यवसायांना बसण्यास सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्राची वार्षिक आर्थिक उलाढाल सुमारे ६० लाख कोटींची आहे. त्यात मराठवाड्याचा वाटा १२ टक्के म्हणजेच ७ ते ७.२५ लाख कोटींच्या आसपास आहे. याचा दरमहा विचार करता ही उलाढाल ५५ ते ६० हजार कोटींपर्यंत जाते.





