गॅस सिलेंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; ग्रामीण आणि शहरी भागासाठी आता नवीन कालावधी लागू

LPG Cylinder Booking Rule | पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा मोठा फटका आता भारतीय स्वयंपाकघराला बसत आहे. एलपीजी गॅस पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सिलेंडर बुकिंगच्या नियमांमध्ये एक अतिशय मोठा बदल केला आहे. नव्या नियमानुसार आता ग्रामीण भागातील ग्राहकांना 45 दिवसांनंतरच नवीन एलपीजी सिलेंडर बुक करता येणार आहे. तसेच शहरी भागातील ग्राहकांना दोन बुकिंगच्या दरम्यान 25 दिवसांचे अंतर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
यापूर्वी देशभरात गॅस सिलेंडर बुकिंगसाठी 21 दिवसांचा कालावधी निश्चित होता, जो अलीकडेच वाढवून 25 दिवस करण्यात आला होता. गॅस टंचाईच्या अफवांमुळे अनेक ग्राहक गरजेपेक्षा आधीच म्हणजे केवळ 15 दिवसांच्या अंतराने बुकिंग करू लागले होते. त्यामुळे साठेबाजी आणि काळाबाजाराची मोठी शक्यता वाढल्याने बुकिंगमधील हे अंतर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या मते, या नव्या निर्णयामुळे गॅस पुरवठ्यावर अचानक पडणारा दबाव कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.
हेही वाचा : ‘अक्षय खन्नाला मी अभिनय शिकवला’; अभिनेता अनुप सोनी यांचा खुलासा
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संसदेत माहिती देताना देशात गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, जगात सध्या ऊर्जा क्षेत्रात मोठा तणाव निर्माण झाला असला तरी भारताची कच्च्या तेलाची पुरवठा स्थिती पूर्णपणे सुरक्षित आहे. भारत अनेक देशांकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याने देशातील ऊर्जा पुरवठा सुरळीत ठेवण्यात सरकारला मोठे यश आले आहे. गेल्या 5 दिवसांत देशातील एलपीजी उत्पादनात तब्बल 28 टक्क्यांनी मोठी वाढ करण्यात आली आहे.
देशातील 33 कोटी कुटुंबांच्या स्वयंपाकघरात गॅसची कोणतीही कमतरता भासू नये, ही सरकारची सर्वात मोठी प्राथमिकता असल्याचे हरदीप पुरी यांनी सांगितले. लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एलपीजीच्या मुद्यावरून लहान व्यापारी आणि रेस्टॉरंट्सवर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त केली होती. यावर उत्तर देताना पुरी यांनी स्पष्ट केले की, हा अफवा पसरवण्याचा काळ नसून देशातील गॅस पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे.





