सावध व्हा.. नेपाळच्या परिस्थितीवरून संजय राऊतांचा इशारा

मुंबई | भारताच्या शेजारील देश नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून तीव्र हिंसक आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी संसद, शासकीय इमारती, तसेच विद्यमान आणि माजी पंतप्रधानांच्या निवासस्थानांना लक्ष्य केले आहे. या हिंसक निदर्शनांमुळे निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या घटनाक्रमावर भारतातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नेपाळमधील परिस्थितीवर भाष्य करताना भारताला सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
संजय राऊत यांनी एक्सवर नेपाळमधील हिंसाचाराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तेथील अर्थमंत्र्यांना रस्त्यावर पळवून पळवून मारले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये राऊत यांनी लिहिले, “ही परिस्थिती कोणत्याही देशात उद्भवू शकते. सावध व्हा. भारत माता की जय, वंदे मातरम!” या पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, वित्तमंत्री निर्मला सीतारमण आणि भाजपला टॅग केले आहे. राऊत यांच्या या सूचक विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
हेही वाचा : पोहायला गेला अन् घात झाला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नेपाळमधील हिंसाचारावर दुख: व्यक्त केले आहे. त्यांनी एक्सवर लिहिले, “नेपाळमधील हिंसा हृदयविदारक आहे. अनेक तरुणांनी आपले प्राण गमावले याचे दुख: आहे. नेपाळची स्थिरता, शांती आणि समृद्धी भारतासाठी महत्त्वाची आहे. मी नेपाळमधील सर्व बंधू-भगिनींना शांतता राखण्याचे आवाहन करतो.” मोदी यांनी मंगळवारी सुरक्षा समितीच्या बैठकीत नेपाळमधील घटनाक्रमावर सविस्तर चर्चा केल्याचेही सांगितले.





