‘आप’मधील फुटीनंतर ७ खासदारांच्या अपात्रतेची मागणी

नवी दिल्ली | आम आदमी पक्षाच्या (आप) १० पैकी ७ राज्यसभा खासदारांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पक्षांतरानंतर संतप्त झालेल्या ‘आप’ने सातही खासदारांच्या अपात्रतेसाठी राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपतींकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘आप’चे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय सिंह यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, संविधानातील दहाव्या अनुसूचीनुसार (पक्षांतरबंदी कायदा) अशा प्रकारच्या फुटीला कायदेशीर मान्यता मिळत नाही. संसदेत किंवा विधानसभेत दोन-तृतीयांश बहुमत असले तरी पक्षांतराला वैधता मिळत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा
एअर इंडियाला २० हजार कोटींचा तोटा; उड्डाणांमध्ये १५-२०% कपातीची तयारी
“या सात खासदारांचे पक्षांतर पूर्णपणे बेकायदेशीर, घटनाबाह्य आणि संसदीय नियमांच्या विरोधात आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या प्रकरणात याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे,” असेही सिंह यांनी नमूद केले.
दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सात खासदारांमध्ये राघव चड्ढा, स्वाती मालीवाल, हरभजन सिंह, संदीप पाठक, अशोक मित्तल, राजिंदर गुप्ता आणि विक्रमजीत सिंह साहनी यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींमुळे संसदीय राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





