एअर इंडियाला २० हजार कोटींचा तोटा; उड्डाणांमध्ये १५-२०% कपातीची तयारी

Air India | एअर इंडिया विमान कंपनीला आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये सुमारे २० हजार कोटी रुपयांचा तोटा झाल्याने कंपनी आपल्या विमान सेवांमध्ये १५ ते २० टक्क्यांपर्यंत कपात करण्याच्या विचारात आहे. वाढत्या विमान इंधनाच्या किमती आणि ऑपरेशनल खर्चामुळे हा निर्णय घेण्याची वेळ कंपनीवर आली आहे.
या प्रस्तावित कपातीचा सर्वाधिक परिणाम आंतरराष्ट्रीय मार्गांवर, विशेषतः युरोप आणि उत्तर अमेरिकेकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या उड्डाणांवर होण्याची शक्यता आहे. फेऱ्यांमध्ये कपात झाल्यास आगामी काळात आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा
शिवाजी महाराजांचा अपमान करणे हे भाजपचे धोरण; हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
एअर इंडिया ग्रुपच्या सध्या सुमारे १,१०० दैनंदिन उड्डाणांपैकी १०० हून अधिक उड्डाणांवर या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो. कंपनी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर दररोज ७०० हून अधिक उड्डाणे चालवते. शेड्यूलमध्ये स्थिरता आणणे आणि शेवटच्या क्षणी होणारा प्रवाशांचा त्रास कमी करणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, वाढत्या विमान इंधनाच्या किमती, हवाई मार्गांतील बदलांमुळे वाढलेला उड्डाणाचा कालावधी आणि परदेशी मार्गांवरील वाढता वाहतूक खर्च यामुळे विमान कंपन्यांवर आर्थिक ताण वाढत आहे. परिणामी, एअर इंडिया नेटवर्क-व्यापी कपातीचे मूल्यांकन करत असून एअर इंडिया एक्स्प्रेसमध्येही १० ते १५ टक्क्यांपर्यंत कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





