जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत २ जवान शहीद, एका दहशतवाद्याचा खात्मा

Operation Akhal | जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील अखल देवसर परिसरात गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन अखल’ दरम्यान शनिवारी सकाळी तीव्र चकमक झाली. या चकमकीत भारतीय सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले, तर एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आले आहे.
भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) यांच्या संयुक्त पथकाने १ ऑगस्ट रोजी अखलच्या घनदाट जंगलात दहशतवादी लपल्याच्या गुप्त माहितीवरून ही कारवाई सुरू केली होती. शनिवारी सकाळी जोरदार गोळीबारादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला, ज्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत दोन जवानांना वीरमरण प्राप्त झाले, तर एक दहशतवादी ठार झाला.
हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांची चर्चा; रशियाची भूमिका स्पष्ट…
सुरक्षा दलांनी आतापर्यंत या ऑपरेशनमध्ये एकूण सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे, तर सहा जवान जखमी झाले आहेत. घनदाट जंगल आणि डोंगराळ प्रदेशामुळे दहशतवाद्यांचा शोध घेणे आव्हानात्मक ठरत आहे. सूत्रांनुसार, अजूनही काही दहशतवादी जंगलात लपले असण्याची शक्यता आहे, त्यामुळे ऑपरेशन अजूनही सुरू आहे.
जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक नलिन प्रभात आणि लष्कराच्या १५ व्या कॉर्प्सचे कमांडर या कारवाईवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सुरक्षा दलांनी परिसराला पूर्णपणे वेढा घातला असून, हायटेक ड्रोन आणि रुद्र अटॅक हेलिकॉप्टरच्या साहाय्याने शोधमोहीम तीव्र केली आहे.
या कारवाईला ‘ऑपरेशन अखल’ असे नाव देण्यात आले असून, ही २०२५ मधील सर्वात मोठी दहशतवादविरोधी कारवाई मानली जात आहे. स्थानिकांना जंगल परिसरात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





