कुलकर्णींचा मतदारसंघ गेला..टिळकांचा मतदारसंघ गेला..आता नंबर बापटांचा का? कसब्यातील बॅनर्सची चर्चा
पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांसाठी भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याविरोधात स्थानिक ब्राह्मण समाजात नाराजी असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात सूचक भाष्य करणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत.
कसब्यात कुलकर्णींचा मतदारसंघ गेला..टिळकांचा मतदारसंघ गेला..आता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार? अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर कसब्यातील एक जागरूक मतदार इतकेच लिहलं आहे.
जगताप कुटुंबाला न्याय आणि टिळक कुटुंबावर अन्याय आधी मेधा ताई, नंतर देवेंद्रजी आणि आता टिळक कुटुंबीय यांना संधी नाकारण म्हणजेच भाजपला काही जातींची केवळ मते हवी असतात त्या जाती नकोच असतात, अशी टिका ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी केली आहे.
दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोथरूडच्या स्टँडिंग आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना निवडणूक लढवली होती. तर आता या पोटनिवडणुकीत टिळकांचे तिकीट कपात म्हणजे ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधित्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप भाजपवर केला जात आहे.