जेएनपीए सायबर हल्ला : चौकशी अहवाल लवकरच ; अध्यक्ष संजय सेठी यांची माहिती
मुंबई | जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या (जेएनपीए) एका कंटनेर टर्मिनलमध्ये फेब्रुवारीमध्ये सायबर हल्ला झाला होता. या प्रकरणाची जेएनपीएकडून चौकशी सुरू असून चौकशीचा अहवाल येत्या दोन आठवडय़ात सादर होण्याची शक्यता आहे. या अहवालानंतरच हा हल्ला नेमका कसा झाला आणि हल्ल्याबाबतच्या इतर बाबी समोर येतील. महत्त्वाचे म्हणजे भविष्यात असे हल्ले रोखण्यासाठी अहवालात शिफारशी करण्यात येणार आहेत.
जेएनपीएची एकूण पाच कंटनेर टर्मिनल आहेत. यातील एका कंटनेर टर्मिनलमध्ये फेब्रुवारीला सायबर हल्ला झाला होता. यामुळे संपूर्ण यंत्रणेमध्ये व्यत्यय आला होता. मात्र याचा जेएनपीएच्या कार्गोच्या कामावर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यानी दिली. तर या हल्ल्याची चौकशी सुरू असून यासंबंधीचा अहवाल येत्या दोन आठवडय़ात सादर होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. ‘पंतप्रधान गती-शक्ती’ कार्यक्रमाअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.