‘अहमदनगरमध्ये आम्ही तुतारी वाजवल्याशिवाय राहणार नाही’; जयंत पाटलांचं विधान
पुणे | आमदार निलेश लंके लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहे. निलेक लंके यांनी गेल्या आठवड्यात शरद पवार यांची भेट घेतली. मात्र यावेळी लंके आणि शरद पवार यांनी निवडणूक लढवण्याबाबत मौन बाळगलं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सूचक विधान केलं आहे.
जयंत पाटील म्हणाले की, निलेश लंके हे अहमदनगरमधील लोकप्रिय नेते आहेत. ते तिथून लोकसभेसाठी उभे राहिले तर १०० टक्के निवडून येतील. त्यांच्याबाबत आम्ही या मताचे आहोत की, लंके आमचे उमेदवार व्हावेत. त्याबाबतीत आवश्यक ते सोपस्कार आम्ही योग्य वेळी पूर्ण करू. मी निलेश लंके यांना तुतारी (तुतारी वाजवणारा माणूस हे शरद पवार गटाचं निवडणूक चिन्ह आहे.) भेट दिली होती.
हेही वाचा – उष्माघात टाळण्यासाठी नारळ पिणे आरोग्यासाठी फायदेशीर!
निलेश लंके यांनी तुतारी स्वीकारली की नाही याबाबत मी सध्या भाष्य करणार नाही. कारण असं केल्याने लंके अडचणीत येऊ शकतात आणि मला त्यांना अडचणीत आणायचं नाही. परंतु, मी एक गोष्ट ठामपणे सांगेन की आम्ही अहमदनगर लोकसभा मतदारसंघात तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही, असंही जयंत पाटील म्हणाले.