#Covid-19: करोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने सेवेत घ्या
- परिवहनमंत्र्यांच्या एसटी महामंडळाला सूचना
मुंबई |
राज्यात एसटी महामंडळाचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात करोनाबाधित होत असून मृत कर्मचाऱ्यांची संख्या २२८ झाली आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर एसटीत नोकरी देण्याचा निर्णय घेतलेला असतानाही अद्याप एकाही वारसाला नोकरीचे पत्र मिळालेले नाही. या कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने सेवेत घ्या आणि तसा प्रस्ताव सादर करा, अशा सूचना परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी महामंडळाच्या संबंधित विभागाला केल्या आहेत. करोनाच्या साथीत, एप्रिल २०२० पासून ते आतापर्यंत ७ हजार ९७० कर्मचारी करोनाबाधित झाले असून २२८ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाकाळात कामावर असताना मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनाच्या नियमानुसार ५० लाख रुपये आर्थिक मदत एसटीकडून दिली जाणार आहे.
आतापर्यंत ११ जण यासाठी पात्र ठरले आहेत. तर करोनामुळे मत्यू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वारसांना एसटीत अनकंपातत्वावर नोकरी देण्याचाही निर्णय महामंडळाने गेल्यावर्षी करोनाकाळात घेतला होता. त्यानुसार वारसांनी एसटीच्या मुंबईतील मुख्यालयाकडे तसेच राज्यातील विभागीय कार्यालयांकडे अर्ज व कागदपत्रे सादर के ली. परंतु अर्ज करून आठ ते दहा महिने उलटूनही व त्यासाठी कार्यालयांत हेलपाटे मारूनही नोकरीबाबत ठोस उत्तर मिळाले नाही. त्यावर वारसांकडून नाराजीही व्यक्त करण्यात आली. करोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांचा सोमवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी आढावा घेतला. यावेळी करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना तातडीने सेवेत घेण्याबाबत प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या. करोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांवर तातडीने उपचार मिळावे यासाठी महामंडळाच्यावतीने राज्यभरात विभागीय पातळीवर समन्वय कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तसेच जिल्हास्तरावर कामगार अधिकाऱ्यांकडे समन्वय करण्याची जबाबदारी देण्यात यावी व त्याचा नियमित आढावा घ्यावा, असेही निर्देश त्यांनी दिले.
- २२८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू
कु र्ला, परेल, मुंबई सेन्ट्रल, उरण, पनवेल आगार, मुंबई सेन्ट्रल मुख्यालय या मुंबई विभागात मिळून चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून ठाण्यातील दोन आगार, कल्याण, भिवंडी, शहापूर, विठ्ठलवाडी,वाडा या ठाणे विभागात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिकमधील दोन आगार, सिन्नर, मालेगाव, लासलगाव, मनमाड, सटाणा, पिंपळगाव या नाशिक विभागात १९ कर्मचाऱ्यांचा, धुळे विभागात १५, सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, करमाळा, बार्शी या सोलापूर विभागात १४, सातारा विभागात १२, पुणे विभागात ११, धुळे विभागात १५ आणि नागपूर विभागात १२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.