तब्बल १२ वर्षांनी वानखेडे स्टेडियमवर रंगणार भारत विरूद्ध श्रीलंका सामना
IND vs SL : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर तब्बल १२ वर्षांनी भारत विरुद्ध श्रीलंका सामना रंगणार आहे. यापूर्वी २०११ मध्ये भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात वानखेडे स्टेडिअमवर एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला गेला होता. या सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला होता. अशातच आता भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील साखळी सामना २ नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दुपारी २ वाजता खेळवला जाणार आहे.
यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघाने सहा सामने जिंकले आहे. आत्तापर्यंत भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात १६७ सामने खेळले आहेत. यामध्ये भारतीय संघाने ९८ सामने जिंकले आहेत, तर श्रीलंकेने ५७ सामने जिंकले आहेत. त्यामुळे २ नोव्हेंबरला कोणता संघ बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
हेही वाचा – मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय ठराव, ठरावात नेमकं काय? वाचा..
गुणतालिकेतले पहिले सात संघ नॉकआऊट स्थितीत पोहोचले आहेत. उपांत्य फेरीत नेट रनरेटच्या समीकरणाशिवाय आपलं स्थान सुरक्षित करण्यासाठी कुठल्याही संघाला १४ गुणांची आवश्यकता आहे. टीम इंडिया अद्याप १२ गुणांवर आहे. तसेच स्पर्धेत असे काही संघ आहेत जे सहज १२ गुण मिळवू शकतात. भारतीय संघाने पुढचे तिन्ही सामने गमावले. तर भारतीय संघाऐवजी इतर चार संघ बाद फेरीत पोहोचू शकतात. गुणतालिकेची सध्याची परिस्थिती पाहता किमान दोन संघ १२ गुणांसह बाद फेरीत पोहोचणार आहेत. तर दोन संघ १४ किंवा त्याहून अधिक गुणांसह बाद फेरीत दाखल होतील.