संजय राऊतांची सुरक्षा वाढवली, राणेंच्या इशाऱ्यानंतर घेतला निर्णय
मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे वृत्त सध्या समोर येत आहे. राणे-शिवसेना वादाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या सुरक्षेत ही वाढ करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. यापुढे विशेष सुरक्षा पथकाचे सहा जवान त्यांच्या सुरक्षेत असणार आहेत. त्याशिवाय, राऊत यांच्या घराबाहेर व सामना कार्यालयाबाहेरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याचसोबत डीसीपी प्रशांत कदम संजय राऊत यांच्या भेटीला गेल्याची देखील माहिती आहे. दरम्यान, भाजप नेते नितेश राणे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आणि राणे-सेना वादानंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यात मोठा राजकीय संघर्ष झाला.अनेक ठिकाणी आंदोलने झाली. तर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी राणे पिता-पुत्रांवर शाब्दिक तोफ डागली. या साऱ्या प्रकरणात नारायण राणे यांचे ज्येष्ठ चिरंजीव व माजी खासदार नीलेश राणे यांनी ‘संजय राऊत जिथे दिसतील, तिथे त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू’,असा इशारा संजय राऊत यांना दिला आहे.या सगळ्या पार्श्वभूमीवर राऊत यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांच्याकडे सध्या वाय दर्जाची सुरक्षा आहे. राऊत यांच्या या ताफ्यात सध्या ६ शस्त्रधारी SPU जवानांचा ताफा आहे. मात्र, आता त्यांच्या ताफ्यात २ अतिरिक्त SPU चे जवान देखील समाविष्ट करण्यात आले आहेत. राऊत यांच्या सुरक्षेत १२ पोलीस जवानांसहीत साध्या वर्दीतील पोलिसांचा समावेशही करण्यात आला आहे.
खरंतर शिवसेना-राणे वाद हा काही महाराष्ट्राला नवा नाही. केंद्रीय मंत्री नारायण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या खळबळजनक वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले. भाजपा-सेना आमने-सामने आले. यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये देखील शाब्दिक चकमकी झाल्या. त्यामुळे संजय राऊत आणि राणे वाद पेटण्यास सुरुवात झाली. राणेंचे दोन्ही पुत्र यांनी या वादात उडी घेतली होती. यावेळी अत्यंत टोकाच्या टीका पाहायला मिळाल्या. याच पार्श्वभूमीवर राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याचे समजते.