यवतमाळच्या शेतकरी पुत्रांची कंपनी ‘फोर्ब्स’च्या यादीत, जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा…
यवतमाळ । महाईन्यूज ।
अमेरिकन व्यावसायिक मासिक असलेल्या ‘फोर्ब्स’ यादीत आपले स्थान मिळवण्याचा विक्रम यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील शेतकरी पुत्राने केला आहे. आशिया खंडातील नामांकित अग्रगण्य सामाजिक उद्योजकता क्रमवारीत त्यांचा ‘ग्रामहीत’ (gramheet company) या कंपनीला प्रमुख १०० कंपन्यांमध्ये जागा मिळाली आहे, त्यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ‘फोर्ब्स’ हे मासिक वर्षातून केवळ आठ वेळा प्रकाशित होते. यात वित्त,उद्योग, गुंतवणूक आणि विपणन या विषयावरील लेख प्रसिद्ध होतात. ‘फोर्ब्स’ तंत्रज्ञान, संप्रेशन,विज्ञान, राजकारण आणि कायदा यासारख्या संबंधित विषयावरही अहवाल देते. त्यामुळे ‘फोर्ब्स’ यादीत स्थान मिळवणे साधी सोपी गोष्ट नाही. मात्र आर्णीतील उच्चशिक्षित शेतकरी जोडपे पंकज महल्ले व श्वेता ठाकरे (महल्ले) या दोघांनी आपल्या कर्तृत्वातून ही किमया साधली आहे. त्यांची ‘ग्रामहीत’ ही संस्था शेतकऱ्यांसाठी उभी केली. ही संस्था सध्या शेतमालाच्या बाजारपेठेतील चढउतारात शेतकऱ्यांना सुरक्षितता मिळवून देते.
जगातील गुंतागुंतीच्या समस्या नावीन्यपूर्ण रीतीने सोडविण्याच्या उद्देशाने वस्तू व सेवा पुरवणाऱ्या संस्थांची ‘फोर्ब्स’ दखल घेत असते. त्या कंपनीची कामगिरी जगासमोर मांडून नव्या सामाजिक उद्योजकांना प्रोत्साहन देत असते. ‘फोर्ब्स’ यादीत निवड व्हावी म्हणून ६५० कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. यात ग्रामहिताचाही समावेश होता. ही कंपनी शेतकऱ्यांना शेतात साठवून विक्री करण्याची शास्त्रोक्त व आधुनिक पद्धत उपलब्ध करून देते.
देशात शेतमाल विक्री सगळीकडेच एका कनिष्ठ चक्रव्यात अडकलेली आहे.पीक काढणी हंगामात एकाच वेळी बहुतेक शेतकरी आपला माल विविध कारणांनी विक्रीला आणतात. स्वाभाविक व्यापारी वर्ग शेतमालाचे भाव पाडतो. देणेकरांच्या दबावामुळे व उसनवार फेडण्यासाठी शेतकरी मिळेल त्या भावात माल विकून मोकळे होतात.