२५० झाडे कापून जमिनीत पुरली, सौर ऊर्जा कंपनीला आता १० पट झाडे लावण्याची शिक्षा
जोधपूर । महाईन्यूज । वृत्तसंस्था ।
सौर प्रकल्प उभारण्यासाठी एका कंपनीने २५० झाडे कापली. याविरोधात तेथील लोकांनी तीव्र आंदोलन पुकारून कंपनीविरोधात लढा दिला. त्यामुले या कंपनीला आता चांगलाच दंड बसला आहे. या कंपनीला आता अडीच हजार झाडे लावावी लागणार असून त्यांना दोन लाखांचा दंडही भरावा लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एएमपी एनर्जी ग्रीन फोर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जोधपूर जिल्ह्यातील फलोदी उपविभागातील बडी सिद्द गावात सौर प्रकल्पावर काम करत आहे. 10 जून रोजी या कंपनीच्या व्यवस्थापनाने खेजरी आणि रोहिडा या गावातील 250 झाडे कोणतीही मान्यता न घेता तोडली. एवढेच नाही तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी प्रकरण लपवण्यासाठी ही झाडे जमिनीत गाडली. येथे झाडे गायब झाल्याने बिष्णोई समाजाच्या लोकांना धक्का बसला. त्यांनी अचानक गायब झालेल्या झाडांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
शोध घेत असताना स्थानिकांना झाडे जमिनीत गाडल्याचे दिसले. त्यांनी झाडांचे अवशेष खोदून काढले. यानंतर बिष्णोई समाजातील लोकांनी आंदोलन पुकारले. शासन व प्रशासनाकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी समाजाने केली आहे. वास्तविक हा समाज खेजडी आणि रोहिडा या झाडांना देव मानतो. त्यामुळे त्याविरोधात आंदोलन उभे राहिले. ज्या दिवशी झाडांचे अवशेष सापडले, त्या दिवसापासून आठवड्यातून ५ दिवस जोरदार निदर्शने तर झालीच, पण समाजाने उपोषणही केले. प्रकरण वाढत असल्याचे पाहून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून संबंधितांवर कारवाई करू असे आश्वासन स्थानिकांना दिले.