तारापूरमध्ये निर्भया केमिकलला भीषण आग, जीवितहानी टळली
पालघर | तारापूर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नंबर एन-९६ मधील निर्भया केमिकल कंपनीला मंगळवारी रात्री १०.३०च्या सुमारास भीषण आग लागली. ज्वलनशील पदार्थांच्या साठ्यामुळे काही क्षणांत ती भडकली. त्यावेळी कंपनीत काही कामगार काम करत होते. मात्र धोक्याचा सायरन वाजल्यामुळे ते तातडीने बाहेर पडले. त्यामुळे यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे पोलिसांनी सांगितले.
तारापूर एमआयडीसीत काही दिवसांपासून सतत आगीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे कंपन्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असतानाच रात्री १०.३०च्या सुमारास निर्भया केमिकल्स या कंपनीला आग लागली. त्यावेळी काही कामगार कंपनीत काम करत होते. आगीची माहिती मिळताच पहारेकऱ्याने धोक्याचा सायरन वाजवला. त्यामुळे कामगार तात्काळ बाहेर पडले. कंपनीत रसायनांचा साठा असल्यामुळे आग भडकली. आगीची माहिती मिळताच तारापूर एमआयडीसीचे अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने अनेक तास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे.