चेंगराचेंगरीत शेकडो लोकांनी गमावलेले जान
इंडोनेशियातील फुटबॉल स्टेडियम उद्ध्वस्त करणार
इंडोनेशिया ।
इंडोनेशियातील मलंग येथील कांजुरहान स्टेडियम पाडून पुन्हा बांधले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. या स्टेडीयममध्ये मागील काही दिवसांपूर्वी चेंगराचेंगरी झाली होती. या चेंगराचेंगरीत तब्बल 133 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे फुटबॉल स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीबाबत इंडोनेशिया सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
इंडोनेशियातील स्टेडियम पाडून पुन्हा बांधले जाणार असल्याची माहिती इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी दिली. याच स्टेडियमवर महिन्याच्या सुरुवातीला सामन्यादरम्यान घडलेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 133 निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला. त्यानंतर या घटनेचं वर्णन फुटबॉल इतिहासातील सर्वात मोठी आपत्ती म्हणूनही करण्यात आले.
“मलंग येथील कांजुरहान स्टेडियम पाडून पुन्हा बांधलं जाणार असल्याची माहिती दिली. ज्यात खेळाडू आणि समर्थक दोघांची सुरक्षा सुनिश्चित असेल”, असे जोको विडोडो यांनी फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांना सांगितले.
या महिन्याच्या सुरूवातीला इंडोनिशियाच्या मलंग शहरातील एका मोठ्या स्टेडियममध्ये अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाय यांच्यात फुटबॉल सामना रंगला होता. मात्र, सामन्यात पर्सेबाया सुराबाय संघाने अरेमा एफसीवर मात करत सामना 3-2 च्या फरकाने जिंकला. त्यानंतर अरेमा एफसी संघाच्या चाहत्यांनी मैदानावर येत गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यामुळे दोन्ही संघाच्या चाहत्यांमध्ये वाद सुरू झाला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने तेथील सुरक्षारक्षकही आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करू लागले.
दोन्ही संघाच्या चाहत्यांमधील वाढता वाद पाहता नॅशनल आर्म फोर्सला घटनास्थळी बोलवण्यात आले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. घटनास्थळी पोहचलेल्या जवानांनी सर्वांना बाहेर काढले. स्टेडियमच्या बाहेर आल्यानंतरही दोन्ही संघाच्या समर्थकांमध्ये पुन्हा एकदा हाणामारी सुरु झाली. या दुर्घटनेत 133 निष्पात लोकांना जीव गमवावा लागला. या घटनेसाठी जबाबदार असलेल्या लोकांची ओळख पटवून त्यांना शिक्षा करण्याचे आदेश देण्यात आले.