प्रभू रामचंद्रांहून राहुल गांधी यांची पदयात्रा जास्त अंतराची
राजस्थानच्या मंत्र्याचे वक्तव्य
नवी दिल्ली / मुंबई : राजस्थानचे आरोग्यमंत्री परसादिलाल मीणा यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी याच्या ‘भारत जोडो’ यात्रेची तुलना भगवान श्रीरामाशी केल्याने नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत सारवासारव करण्याचा प्रयत्न करताना आरोग्यमंत्री परसादिलाल मीणा यांच्या सुरात सूर मिसळला आहे.
प्रभू श्रीराम हे अयोध्येहून श्रीलंकेपर्यंत चालत गेले होते. पण आता काँग्रेस खासदार राहुल गांधी हे कन्याकुमारीहून काश्मीरपर्यंत चालत जात आहेत. तसे पाहिले तर, राहुल गांधी यांचे श्रीरामांपेक्षाही जास्त चालणे होईल, असे राजस्थानचे आरोग्यमंत्री परसादिलाल मीणा यांनी म्हटले आहे. तसेच, आजवरच्या इतिहासात कोणाचीही इतकी लांब अंतराची यात्रा झालेली नाही आणि कोणी एवढी यात्रा करणारही नाही. राहुल गांधी यांची ही ऐतिहासिक यात्रा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नाना पटोलेंकडून सारवासारव
राहुल गांधी आणि रामाची तुलना काँग्रेसला करायची नाही. केवळ भाजपाचे नेतेच करतात. राहुल गांधी हे मानव आहेत आणि मानवतेसाठीच काम करतात, अशी सारवासारव काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. मात्र, राहुल गांधी आणि राम या दोघांच्याही नावाची सुरुवात ‘रा’ने होते, हा केवळ योगायोग आहे, असे सांगत त्याच सुरात सूरही मिसळला. राहुल गांधी ज्या मार्गाने जात आहेत, तसेच मार्गक्रमण शंकराचार्य यांनीही केले होते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
मोदी हे विष्णूचा अवतार, भाजपाने केला होता दावा
नरेंद्र मोदी हे विष्णूचा अकरावा अवतार असल्याचे भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी सुमारे चार वर्षांपूर्वी म्हटले होते. हिंदू संस्कृतीत 33 कोटी देव आहेत, पंचमहाभूते आहेत, भारतमातेला आपण देव मानतो. अगदी त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानसेवक असून ते भारतमातेची सेवा ज्याप्रकारे करत आहेत, त्यामुळे आमच्यासाठी ते देवासमानच आहेत. याच भावनेतून मी त्यांना विष्णूचा अकरावा अवतार म्हटले आहे, असे त्यांनी त्यावेळी म्हटले होते.