तापमानवाढीची जगभरात झळ, हवामान बदलामुळे मानवी आयुष्याला धोके
जागतिक स्तरावर तापमान सरासरी १.६५ अंश सेल्सिअस

पुणे : एकीकडे जगभरात हवामान बदलाची झळ जाणवत असताना जागतिक स्तरावर तापमान सरासरी १.६५ अंश सेल्सिअसने वाढले आहे, तर दुसरीकडे राज्यात फेब्रुवारीतच उष्णतेची लाट येण्यास सुरुवात झाली आहे. आतापासून योग्य पावले न उचलल्यास तीव्र दुष्काळ, समुद्राच्या पातळीत वाढ आणि पक्षी-प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होणे, असे धोके निर्माण होतील, अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
जागतिक तापमानात होणारी वाढ, हवामानात होणारे बदल, अशा विषयांवर गेल्या दोन दशकांपासून वैश्विक स्तरावर विचारमंथन होत आहे. जागतिक तापमानवाढ, हवामान बदल ही प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.
परंतु, सध्या तिचा वेग प्रचंड वाढला आहे. २३ मार्च हा ‘जागतिक हवामान दिन’ म्हणून साजरा केला जातो. २३ मार्च १९५०ला परिषदेमध्ये जागतिक हवामान संघटनेची स्थापना करण्यात आली. या निमित्ताने १९५१पासून जागतिक हवामान दिन साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून हवामान, शाश्वत विकास क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधला.
हेही वाचा – ‘दंगलखोरांकडून झालेल्या नुकसानीची भरपाई वसूल करणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सद्यःस्थिती काय?
१९ व्या शतकाच्या तुलनेत आता जगभरातील तापमान १.२ अंश सेल्सिअसने वाढले
वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण साधारण ५० टक्क्यांनी वाढले
२१००पर्यंत हवामान बदलाचे प्रमाण १.५ अंश सेल्सिअसपर्यंत रोखणे गरजेचे
या शतकाच्या अखेरपर्यंत पृथ्वीचे तापमान दोन अंशांनी वाढण्याची भीती
परिणामी जीवसृष्टीचे होणारे नुकसान न भरून येणारे असेल
हरितगृह वायूचे प्रमाण वाढले
विविध मानवी घडामोडींमुळे जागतिक तापमानात वाढ झपाट्याने होत आहे. वीज प्रकल्प, वाहतूक आणि घरांमध्ये उष्णता वाढविण्यासाठी आपण इंधन, गॅस आणि कोळसा वापरायला सुरुवात केली. तेव्हापासून आतापर्यंत जगात १.२ अंश सेल्सिअस तापमान वाढले आहे. शिवाय इंधनांच्या वापरामुळे हवेत सोडले जाणारे हरितगृह वायू सूर्याची ऊर्जा अडवतात. १९व्या शतकापासून आतापर्यंत वातावरणातील कार्बन डायऑक्साईड या एकट्या हरितगृह वायूचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या २० वर्षांत त्यात १२ टक्के वाढ झाली आहे. हरितगृह वायूचे प्रमाण वाढण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण जंगलतोड आहे, असे गोखले इन्स्टिट्यूटच्या शाश्वत विकास केंद्राचे संचालक गुरुदास नूलकर यांनी सांगितले.
बदलाचे परिणाम
सुपीक जमिनीचे रेताड जमिनीत रूपांतर होणे
पाण्याच्या कमतरतेमुळे पिके, अन्न उगवणे कठीण होणार
मुसळधार पाऊस
समुद्राच्या पातळीतील वाढीमुळे काही भागांत प्रचंड उष्णता वाढेल, ती ठिकाणे निवासास योग्य राहणार नाहीत.
हवामानात टोकाचे बदल जाणवतील
उष्णतेची लाट येणे
वादळे
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
भारताच्या १२५ वर्षांत फेब्रुवारी सर्वांत उष्ण ठरला आहे. हवामान बदलाचे अनपेक्षित परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. शास्त्रज्ञांनी हवामान बदलासाठी १.५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढीची मर्यादा ठरवली होती. २०२४ मध्येच जगाचे सर्वसाधारण तापमान १.६५ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात आले. आता २०२५पर्यंत १.५ अंश सेल्सिअसपर्यंत रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
– कृष्णानंद होसाळीकर, माजीप्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे