पवना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस, नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
धरणातून विसर्ग होणार : पाटबंधारे विभागाकडून नागरिकांना आवाहन
पिंपरी : गेल्या काही तासापासून पवना धरण क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान पवना धरण १०० टक्के भरले असून आज (दि.०२) दुपारी १२ वाजता धरणातून १४०० क्यूसेक्सने विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे.
प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पवना धरण १०० टक्के क्षमतेने भरलेले आहे. तरी विज निर्मिती ग्रुहद्वारे पवना नदी मध्ये पिण्यासाठी व सिंचनासाठी सकाळी ९.३० वाजता ८०० क्यूसेक्स विसर्ग करण्यात आलेला आहे. सदर विसर्ग १२ वाजता वाढवून ८०० क्यूसेक्स वरून १४०० क्यूसेक्स करण्यात येणार आहे. तसेच धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता कधीही पवना धरणाच्या सांडव्यावरून पवना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे.
तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये. नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.