कामचुकार अधिकारी, कर्मचा-यांचे धाबे दणाणले, आयुक्तांनी उगारला हंटर
- परिपत्रक काढून सर्व विभागांना दिले आदेश
- कार्यालयीन वेळेत उपस्थित नसल्यास होणार कारवाई
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – दुपारी “लंच” करण्याच्या नावाखाली कार्यालयाच्या बाहेर कॅन्टीनमध्ये गप्पाटप्पा मारण्याचे कर्मचा-यांचे प्रमाण वाढत चालल्याने त्याला आंकुष राहिला नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी याबाबत परिपत्रक काढले आहे. त्यानुसार कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत कार्यालयात हजर नसल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कामचुकार अधिकारी, कर्मचा-यांचे धाबे दणाणले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांनी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत कार्यालयात हजर राहून काम करावे, असा राज्य शासनाचा नियम असताना तो धाब्यावर बसवला जात आहे. अशा कामचुकार अधिकारी, कर्मचा-यांना शिस्त लावण्यासाठी पालिकेने बायोमेट्रीक थम्ब सुरू केले. तरीही, त्याला आव्हान देऊन आयुक्तांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा उद्योग कामचुकार अधिकारी, कर्मचारी करत असल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार सहायक आयुक्त मंगेश चितळे यांनी पालिका भवनासह क्षेत्रीय कार्यालयातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी स्वतः प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावर अनेक अधिकारी, कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे आढळून आले. असे जवळपास 160 अधिकारी, कर्मचारी कामचुकार असल्याचे निदर्शनास आल्याचा अहवाल चितळे यांनी आयुक्त हार्डीकर यांना सादर केला.
या अहवालानुसार हार्डीकर यांनी परिपत्रक काढून सर्व विभागांना आदेश दिले आहेत. लंचनंतर दुपारी दोन वाजता वेळेत कार्यालयात हजर रहावे. अन्यथा अशा अधिकारी, कर्मचा-यांविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. अधिकारी, कर्मचा-यांनी कार्यालयात प्रवेश करताना दर्शनी भागावर ओळखपत्र लावावे. पदानुसार निश्चित केलेला गणवेश परिधान करावा. अधिकारी, कर्मचा-यांना बायोमेट्रीक थम्ब प्रणालीद्वारे हजेरी लावण्याबरोबच हजेरीपत्रकावर स्वाक्षरी करणेही बंधनकारक आहे. मात्र, काही अधिकारी, कर्मचारी बायोमेट्रीक थम्ब प्रणालीद्वारे हजेरी न लावता केवळ हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करतात. थम्ब करत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते. ही बाब अयोग्य आहे. एका महिन्यात तीन वेळा कार्यालयात उशिरा आल्यास संबंधितांची किरकोळ रजा खर्ची टाकावी. किरकोळ रजा शिल्लक नसल्यास अर्जीत रजा खर्ची टाकावी. ही कार्यवाही दरमहा करण्यात यावी.
याबाबत जारी केलेल्या आदेशाची नोंद सेवानोंद पुस्तकात घ्यावी व रजा वजावट करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पुढील महिन्याच्या 15 तारखेपूर्वी प्रशासन विभागाकडे पाठविण्यात यावा. ज्या महिन्यात एकही अधिकारी, कर्मचारी उशिरा आले नसल्यास त्या महिन्याचा निरंक अहवाल देखील प्रशासन विभागाकडे पाठविण्यात यावा. काही आहरण वितरण अधिकारी स्वत:च्या बाबत बायोमेट्रीक थम्ब प्रणालीद्वारे तीन वेळा उशिरा आल्यास कारवाई करत नाहीत. तसेच, कारवाई न करण्याबाबत कनिष्ठ कर्मचा-यांवर दबाव आणतात. असा दुजाभाव करणा-या अधिका-यांवर कडक कारवाई करण्यात येईल. याबाबतचे अहवाल सादर केले नसल्यास एक वेळ संधी म्हणून ते त्वरीत सादर करावेत.
बायोमेट्रीक थम्ब प्रणालीच्या सवलतीचे प्रशासन विभागाने जारी केलेले आदेश ग्राह्य धरण्यात येतील. विभागांनी परस्पर घेतलेली मान्यता किंवा तोंडी आदेश ग्राह्य धरले जाणार नाहीत. अधिकारी, कर्मचा-यांची बदली झाल्यास त्या विभागातील थम्ब मशिनवर थम्ब रजिस्ट्रेशन शाखा प्रमुखांच्या लेखी परवानगीने करण्यात यावे, असे आदेशात म्हटले आहे.