लॉकडाउनसंबंधी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान; म्हणाले…
पुणे |
राज्यात करोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे लसींचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे. दरम्यान राज्य सरकारने करोनाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर निर्बंधांची घोषणा केली असून वीकेण्ड लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाउन लावण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही लॉकडाउनसंबंधी मोठं विधान केलं आहे.
“जर परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर महाराष्ट्र लॉकडानच्या दिशेने वाटलाच करेल,” असं राजेश टोपे यांनी एनडीटीव्हीशी बोलताना म्हटलं आहे. “आपण लॉकडाउनच्या दिशेने वाटचाल करत आहोत, पण तो करावा लागू नये अशी अपेक्षा आहे. जर त्याआधी आपण करोनाला रोखलं तर आम्ही आनंदी आणि समाधानी असू. आम्ही सर्वोत्तम होईल अशी अपेक्षा करत आहोत,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं. राजेश टोपे यांनी यावेळी आपण लॉकडाउनच्या समर्थनात नसल्याचं स्पष्ट करत सांगितलं की, “पण जेव्हा रुग्णालयांमध्ये गर्दी होऊ लागते, डॉक्टरांची कमतरता जाणवू लागते, औषधांचा तुटवडा निर्माण होतो आणि दैनंदिन रुग्णसंख्येचा सामना करण्यास आपण सक्षम नसतो तेव्हा तात्काळ लॉकडाउन जाहीर करणं हा नियम आहे. जेणेकरुन आपण सुविधा निर्माण करुन परिस्थितीचा सामना करु शकतो”.
वाचा- #Covid-19: स्वत:चं पोट उपाशी ठेवून शेजाऱ्याला लस- उपमुख्यमंत्री अजित पवार