अजित पवारांसमोर हसन मुश्रीफांना अश्रू अनावर; म्हणाले..
कोल्हापूर | राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना भाषण करताना अश्रू अनावर झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज कोल्हापूरमधील मौजे सांगाव गावात विविध विकास कामाचं उद्घाटन झालं. यावेळी आयोजित कार्यक्रमात भाषण करताना हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले. माझ्या जीवनात दोन वेळा राजकीय संकटं आली, परंतु, मतदार पाठीशी असल्यामुळे मी दोन्ही संकटं पेलून नेली, असं मुश्रीफ यावेळी म्हणाले.
हसन मुश्रीफ म्हणाले की, तुमच्या ताकदीवर आजपर्यंत मी अनेक संकट लीलया पेलून नेली आहेत. आपण अनेक संकटांमधून बाहेर पडलो आहोत. यासाठी मी मतदारसंघातल्या जनतेचे मनःपूर्वक आभार मानतो. आजपर्यंत जी संकटं आली, त्यातून आपण बाहेर पडलो. माझ्या कारकिर्दीत दोन वेळा माझ्यावर राजकीय संकटं आली. या काळात मला तुमच्याकडून प्रचंड प्रमाणात साथ मिळाली. जनता माझ्या पाठिशी होती. तुमचा आशीर्वाद होता. त्यामुळेच मी मतदारसंघातल्या सहा निवडणुका जिंकलो. आता मी सातवी निवडणूक लढणार आहे. एखाद्या सामान्य कार्यकर्त्यावर कसं प्रेम करावं ते माझ्या तालुक्यातल्या जनतेने दाखवून दिलं आहे. त्यामुळे मी या जनतेचा आभारी आहे.
हेही वाचा – महाराष्ट्रात एकाच दिवशी ३,१६,३०० कोटींचे सामंजस्य करार, ८३,९०० रोजगार संधी उपलब्ध होणार
मी आधी विक्रमसिंह घाटगे यांचा कार्यकर्ता होतो. छत्रपती शाहू कारखान्याचा मी संचालक, संस्थापक आणि उपाध्यक्ष होतो. परंतु, मला एकदा उमेदवारी दिली नाही. त्यमुळे मी त्यांचं नेतृत्व सोडलं आणि दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांचं नेतृत्व स्वीकारलं. परंतु, नंतर माझ्यात आणि खासदार मंडलिक यांच्यात मतभेद झाले. त्यानंतर मी नवी वाट धरली. या सगळ्या काळात मला जनतेची प्रचंड साथ मिळाली. जनतेने मला साथ दिल्यामुळेच सलग सहा वेळा आमदार म्हणून निवडणूक आलो. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून मी आमदार आहे. बराच काळ सत्तेतही राहिलो. माझ्या मतदारसंघात विकास केला. मंत्री झाल्यावर राज्यभर काम केलं, ही गोष्ट मी अभिमानाने सांगतो, असंही हसन मुश्रीफ म्हणाले.