breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Good News: भोसरीतील समाविष्ट गावांची पाणी समस्या अखेर ‘निकालात’ !


– आमदार महेश लांडगे यांच्याकडून पिंपरी-चिंचवडकरांना ‘मान्सून गिफ्ट’


– चिखलीतील जलशुद्धकरण केंद्र ते देहू जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन


– गेल्या ४० वर्षांत प्रथमच शहरवासीयांसाठी पाण्याच्या नवीन स्त्रोताची निर्मिती

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी समस्या निकालात काढण्यासाठी अखेर यश मिळाले. शहराला सुमारे १०० ‘एमएलडी’ पाणी पुरवठा नियमित होईल, असा नवा स्त्रोत आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने निर्माण झाला असून, २०२१ च्या अखेरपर्यंत पाणी पुरवठा प्रकल्प कार्यान्वयीत होणार आहे.

आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने चिखली येथील नियोजित जलशुद्धीकरण केंद्र ते देहू अशुद्ध जलउपसा केंद्रापर्यंत एम. एस. जलवाहिनी पुरवणे व टाकणे कामाचे भूमिपूजन मंगळवारी (दि.११) करण्यात आले.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सूचवलेल्या ‘फिजिकल डिस्टंसिंग’ च्या नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम घेण्यात आला.

(यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, खासदार श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, अण्णा बनसोडे, सग्राम थोपटे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके आदी उपस्थित होते. )

पवना धरणातून पिंपरी-चिंचवडसाठी सर्वप्रथम १९८४ मध्ये पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. त्यावेळी शहराची लोकसंख्या सुमारे ८ लाख इतकी होती. सध्यस्थितीला शहराची लोकसंख्या सुमारे २७ लाखांच्या घरात आहे. आजही तेव्हढेच पाणी शहराला मिळते. पिंपरी-चिंचवडचे नेतृत्व अनेक दिग्गजांनी केले. मात्र, शहरवासीयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कुणालाही नवीन स्त्रोत निर्माण करता आला नाही. प्रत्येक निवडणुकीत पाण्यावरून राजकारण झाले परंतु, आमदार महेश लांडगे यांनी पाणी प्रश्न निकालात काढला, अशी भावना समाविष्ट गावांतील ग्रामस्थांनी व्यक्त केली.

***

काय आहे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प…?

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने चिखली येथे १०० एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे.  चिखली जलशुद्धीकरण प्रकल्प ते देहूपर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. एम.एस. प्रकारातील या जलवाहिनीचा १२५० ते १४०० इतका डायमीटर आहे.  १० किलोमीटर लांबीच्या या जलवाहिनीतून १०० एमएलडी इतके पाणी उचलण्यात येईल. देहू येथे इंद्रायणी नदीतून पाणी उचलण्यात येईल. ते पाणी चिखली जलशुद्धीकरण प्रकल्पात आणले जाईल. शुद्ध केलेले पाणी चऱ्होली, मोशी, डुडूळगाव, तळवडे, दिघी, चिखली आदी समाविष्ट भागात पुरवठा करण्यात येईल. या भागात होणाऱ्या नवीन प्रकल्पांनाही त्याला फायदा होणार आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावरील ताण कमी होणार आहे.

***

प्रकल्पामुळे अशी होणार पाण्याची बचत…

पिंपरी-चिंचवड महापालिका पवना धरणातून ५०० एमएलडी पाणी नदीतून उपसा करते. त्यापैकी ३० टक्के म्हणजे सुमारे १५० एमएलडी पाणी वाया जाते. मात्र, या बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी थेट जलशुद्धीकरण प्रकल्पात आणणार आहे. त्यामुळे पाणी वाया जाणार नाही. समाविष्ट गावातील पाणीपुरवठा सक्षम केल्यामुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवडवरील पाणीपुरवठ्याचा ताण कमी होईल. आगामी वर्षभरात हा प्रकल्प कार्यान्वयीत होईल, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

***

आमदार लांडगे यांनी दिलेला ‘शब्द’ खरा केला…

महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्यापासून समाविष्ट गावांतील नागरिकांना पायाभूत सोयी-सुविधांपासून वंचित रहावे लागले. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना आमदार महेश लांडगे यांनी समाविष्ट गावांतील सोयी-सुविधा सक्षम करण्याबाबत प्रामाणिक पाठपुरावा करु, असे आश्वासन स्थानिक नागरिकांना दिले होते. त्यावेळी समाविष्ट गावांतील नागरिकांनीही आमदार लांडगे यांना समर्थन दिले. त्यानंतर २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीतही समाविष्ट गावांतून आमदार लांडगे यांच्या नेतृत्ताखाली भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले. तेव्‍हापासून खऱ्या अर्थाने समाविष्ट गावांतील विकासाला चालना मिळाली. गेल्या ३० ते ४० वर्षांत शहरातील पाणी पुरवठ्याबाबत केवळ राजकारण झाले. मात्र, आमदार लांडगे यांनी पाणी समस्या निकालात काढली. आगामी वर्षभरात  समाविष्ट गावातील पाणी समस्या सुटणार आहे, अशा भावना स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button