बसच्या आगीत १२ मृत्युमुखी; नाशिकमधील दुर्घटना
नाशिक : पंचवटीतून जाणाऱ्या औरंगाबाद रस्त्यावरील कैलासनगर चौफुलीवर शनिवारी पहाटे खासगी आराम बस आणि डंपर यांची धडक झाल्यानंतर बसला लागलेल्या भीषण आगीत १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, तर ४१ जण जखमी झाले. यवतमाळहून आलेली ही बस मुंबईकडे निघाली होती. दरम्यान, अपघाताच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मृतांमध्ये बालिका, महिला आणि १० पुरुषांचा समावेश आहे. नातेवाईकांच्या मदतीने सात मृतदेहांची ओळख पटवण्यात आली. जळून खाक झालेल्या उर्वरित मृतदेहांची ओळख पटवणे जिकिरीचे झाले आहे.
बस डंपरच्या डिझेल टाकीवर धडकल्याने ती फुटली आणि आगीचा भडका उडाला. काही क्षणात बसने पेट घेतला. गाढ झोपेत असलेले प्रवासी आगीत सापडले. काहींनी आपत्कालीन दरवाजा, खिडक्यांच्या काचा फोडून बाहेर उडय़ा घेतल्याने ते वाचले. ‘चिंतामणी ट्रॅव्हल्स’ची ही बस शुक्रवारी दुपारी यवतमाळहून मुंबईला निघाली होती. बसमध्ये ५५ प्रवासी होते. पहाटे साडेपाचच्या सुमारास बस नाशिक शहरात येत असताना पंचवटीतील कैलासनगर चौफुलीवर कोळसा वाहून नेणाऱ्या डंपरला तिची धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की, बसची दिशा बदलून ती दुसऱ्या रस्त्यावर काही अंतर फरफटत गेली. बसच्या धडकेनंतर डंपरच्या इंधन टाकीचा स्फोट झाला आणि बसने पेट घेतला. काही प्रवाशांनी जिवाच्या आकांताने खिडक्यांच्या काचा फोडून वा संकटकालीन दरवाजातून उडय़ा घेतल्या. काही प्रवासी मात्र आतच अडकले. त्यांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत १२ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर ४१ जखमी झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.