राष्ट्रवादीच्या मोजक्या नेत्यांची दिल्लीत बैठक
नवी दिल्ली – महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस दलातील निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी या पत्रातून केला आहे. या पत्रानंतर भाजपा नेते गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता दिल्लीत तातडीने बैठक बोलावली आहे. तसेच शिवसेना खासदार संजय राऊतही दिल्लीत जाणार असून पवारांची भेट घेणार आहेत.
वाचा :-उद्धवजी, शरद पवार आणि राष्ट्रवादी तुम्हाला संपवायला निघालेत- चंद्रकांत पाटील
परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर भाजपाकडून देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असून राज्यात अचानक निर्माण झालेल्या या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पक्षाच्या मोजक्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत अनिल देशमुख यांच्याबाबत शरद पवार नेमका काय निर्णय घेणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.