वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई, ३ ते ६ महिन्यांपर्यंत परवाना होणार रद्द
पुणे : वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) ही कारवाई झाली आहे. वाहतुकीच्या नियमांचा वारंवार भंग करणाऱ्या वाहनचालकांची यादी वाहतूक पोलिसांकडून आरटीओला पाठविली जाते. या वाहनचालकांचा परवाना निलंबित करावा, अशी शिफारसही करण्यात येते. पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावावर आरटीओकडून दर महिन्याच्या अखेरीस कारवाई केली जाते. त्यात पोलिसांनी दिलेल्या गुन्ह्यानुसार वाहनचालकांचा परवाना तीन ते सहा महिन्यांपर्यंत निलंबित केला जातो.
मद्यप्राशन करून वाहन चालविणे, अतिवेगाने वाहन चालवणे, सिग्नल तोडणे, हेल्मेट न परिधान करणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक या नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर ही कारवाई केली जाते.
हेही वाचा – ‘छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार समाजाची दिशाभूल करत आहेत’; बबनराव तायवाडे यांचा आरोप
आरटीओकडून परवाना निलंबित करण्यात आल्याची माहिती संबंधित वाहनचालकाला ऑनलाइन दिली जाते. परवाना निलंबनाच्या कालावधीत चालक वाहन चालविताना आढळल्यास त्याच्यावर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करून त्यांचे वाहनही जप्त केले जाऊ शकते.
कधी व किती कालावधीसाठी होणार परवाना रद्द –
३ महिने : अतिवेगाने वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, हेल्मेट न परिधान करणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, ट्रिपल सीट
६ महिने : मद्यप्राशन करून वाहन चालविणे