शेजारच्या घरात पाळणा हालायला लागला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पेढे वाटायला लागतात : सदाभाऊ खोत
पिंपरी: राष्ट्रवादी हा पक्ष असा आहे की शेजारच्या घरात जरी पाळणा हालायला लागला, तरी ते पेढे वाटायला लागतात. २०१४ ला बैलगाडा शर्यती वरची बंदी ही काँग्रेस-राष्ट्रवादीने आणलेली होती. मात्र आता ते श्रेय लाटत आहेत असा टोला माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. चिखली येथे आयोजित भारतातील सर्वांत मोठ्या बैलगाडा शर्यतीला खोत यांनी भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी पिंपरी चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव आदी उपस्थित होते.
बैलगाडा शर्यती सध्या सुरू झाल्या असून त्याचे श्रेय महाविकास आघाडी आणि खासकरून खासदार अमोल कोल्हे यांचे आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतेच व्यक्त केले होते. याला प्रत्युत्तर देताना सदाभाऊ खोत म्हणाले की, भारतातील सर्वांत मोठी बैलगाडा शर्यत आमदार महेशदादा लांडगे आणि त्यांच्या सहकार्यांनी घेतलेली आहे. राष्ट्रवादी हा पक्ष असा आहे की, शेजारच्या घरात जरी पाळणा हालायला लागला तरी ते पेढे वाटायला लागतात. २०१४ ला बैलगाडा शर्यती वरची बंदी ही काँग्रेस-राष्ट्रवादीने आणलेली होती. आणि ती बंदी उठवण्याच्या संदर्भातला पहिला अध्यादेश माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काढलेला होता.
विधानसभेमध्ये देवेंद्र फडवणीस यांनी बंदी उठविण्याबाबतचे विधेयक आणलेलं होतं. आणि बैल गाड्यावरची बंदी उठवण्याबाबतचा निर्णय घेतलेला होता. उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये शेतकऱ्यांची बाजू ही खऱ्या अर्थाने महेशदादा लांडगे, देवेंद्रजी फडणवीस यांनी जी समिती नेमली होती, तिचा रिपोर्ट ग्राह्य धरला आणि बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठली. त्यामुळे मला वाटतं “उसाला लागला कोल्हा” अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आयता ऊस आला की, कोल्हा तिथं ऊस खायला जातो. त्यामुळे पहिल्यांदा खऱ्या अर्थाने बैल गाड्यांच्या शर्यतीवर बंदी कोणी आणली? कुणाच्या काळात आणली होती? हे त्यांनी स्पष्ट करावे असं सदाभाऊ खोत शेवटी बोलताना म्हणाले.