महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करण्याचे षडयंत्र : मनसे प्रमुख राज ठाकरे
अखिल भारतीय नाट्य परिषदेमध्ये मुलाखत : पाश्चात्य राष्ट्रांच्या धर्तीवर भव्य नाट्यगृह उभारण्यासाठी एकत्रित यावे!
पिंपरी: मराठी कलाकारांनी आपसातील मतभेद दूर सारून मराठी नाट्य क्षेत्राला पुढे घेऊन जाण्यासाठी नवनवीन विषयावर आधारित नाटकं तयार करावे तसेच पाश्चात्य राष्ट्रांच्या धर्तीवर भव्य नाट्यगृह उभारण्यासाठी एकत्रित यावे, नाट्यगृहांच्या उभारणीसाठी मी सर्व राजकिय पक्षांना एकत्रित आणण्यासाठी पुढाकार घेतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.
100 वे अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलन चिंचवड येथे आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या दुसर्या दिवशी दुपारी राज ठाकरे यांची मुलाखत आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, अटक अशी मराठी माणसांची वाटचाल आहे. कारण नाट्य क्षेत्रात मराठी माणसं पुढे आहेत. तसेच मराठी माणसांनी अटकेपार झेंडा लावला आहे.
मराठी नाट्यसृष्टी व चित्रपट सृष्टीतील लोकांनी एकमेकांना आदर द्यावे, मराठी चित्रपट मोठे आहे मात्र मराठी चित्रपटांना स्टार नाही,ही शोकांतिका आहे. तमिळ, तेलगू अशा इतर चित्रपटसृष्टीमध्ये स्टार आहेत, मराठी चित्रपट सृष्टी स्टार नाही . तुम्ही जर तुमचा मान राखला नाही तर लोक तुम्हाला मान देणार नाहीत. नाही रजनीकांत आणि इलाईराजा हे रात्री एकांतात एकमेकांना एकेरी बोलत असतील पण लोकांसमोर आल्यावर ते एकमेकांना सर म्हणून हाक मारतात. त्यांचे एकमेकांशी कसेही संबंध असले तरी ते चार भिंती बाहेर आल्यावर ते एकमेकांचा आदराने उच्चार करतात.

मराठी चित्रपट सृष्टीत कलाकार एकमेकांना एकेरी हाक मारतात नाहीतर ते टोपण नावाने हाक मारतात. कलावंतांनी स्वतःच मोठेपण जपलं पाहिजे दुसऱ्यांना मोठ म्हटलं पाहिजे, तेव्हा लोक तुम्हाला मान देतील हा बदल घडला पाहिजे, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले.
शंभरावा या नाट्य संमेलनाच्या अनुषंगाने सर्व नाट्य व चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी शपथ घ्यायला हवी की ते एकमेकांना आदराने हाक मारतील. कलाकार नसते तर देशात अराजकता माजली असती, कलाकारांनी देशातील लोकांसमोर व्यवस्थेचे चित्र मांडल तसेच लोकांचे मनोरंजन केले. कलाकार त्यांचे प्रश्न माझ्याकडे घेऊन येतात त्याचे कारण कला व कलावंतांबाबत जाणिवा जागृत असल्याने कलाकार माझ्याकडे त्यांचे प्रश्न घेऊन येतात असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गाने पुढचे पाऊल टाकले पाहिजे. राजकारण, समाजकारण संस्थांमध्ये सहभाग घेतला पाहिजे ,केवळ सुशिक्षित असून चालणार नाही तर सुज्ञ होणे गरजेचे आहे . बहिणाबाई चौधरी अशिक्षित होत्या मात्र त्या सुज्ञ होत्या. विविध विचारसरणीचा उगमस्थान महाराष्ट्र. मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण करण्यात येत आहे. जातीजमाती मध्ये वाद घडत नाहित तर ते घडवण्यात येत आहे ,त्यासाठी चॅनेल्स, सोशल मीडिया, नेते काम करत आहेत हे महाराष्ट्राने ओळखले पाहिजे.
महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत : राज ठाकरे
महाराष्ट्राची एकता विखरून टाकायचं यासाठी प्रयत्न सुरू आहेत असेही ठाकरे म्हणाले. मराठी माणसाने दक्ष असायला हवे. मी नेहमी मराठी माणसाला जागृत करण्याचं काम करत आलोय आणि करत राहील. महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत आहे, पूर्वी जमिनीसाठी लढाया व्हायच्या आता अत्यंत चालाखीने जमिनी विकत घेतल्या जात आहेत. परकीय राज्यातून लोकांनी येतात जमिनी खरेदी करतात. अशाने मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला पुण्याला बरबाद राहायला वेळही नाही लागणार, असेही त्यांनी सांगितले. मराठी माणसांची बलस्थाने जी आहेत त्यामध्ये नाट्य क्षेत्र हे आहे. पाश्चात्य राष्ट्रांच्या धरतीवर नाट्यगृह उभारण्यासाठी कलाकारांनी पुढाकार घ्यावा ,प्रस्ताव तयार करावा, मी सर्व राजकारण्यांना एकत्रित करून भव्य थेटर उभारण्यासाठी प्रयत्न करेल.






