बाबरी पाडली तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
उद्धव ठाकरेंना यावर बोलण्याचा अधिकार तरी आहे का?
मुंबई : अयोध्येतील बाबर मशीद पाडण्याबाबत बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा कोणताही संबंघ नाही, असा चंद्रकांत पाटील यांनी मोठा दावा केला आहे. यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, बाबरीच्या मुद्द्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी जे काही वक्तव्य केले आहे, त्याविषयी मी त्यांच्याशी बोललो आहे. मात्र, बाबरी पाडली तेव्हा आताचे माजी मुख्यमंत्री कुठे होते? त्यांना यावर बोलण्याचा अधिकार तरी आहे का? बाबरी आंदोलनात कोणताही पक्ष नव्हता. सर्वच जण रामभक्त म्हणून सहभागी झाले होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली भूमिका जगजाहीर आहे. त्यावेळी ‘गर्व से कहो, हम हिंदू है’, हा नारा बाळासाहेब ठाकरेंनीच दिला होता.
बाबरी पाडल्यानंतर मुंबईत दंगल उसळली तेव्हा मुंबईचे रक्षण हे बाळासाहेबांनीच केले होते. बाबरी पाडल्यानंतर बाळासाहेबांनीच परखड भूमिका घेत याचे समर्थन केले होते. तेव्हा राम मंदिराला ज्यांनी विरोध केला त्यांच्यासोबत जे आता सत्तेत सहभागी झाले आहेत, त्यांना आता बाबरीवर बोलण्याचा काय अधिकार आहे? अयोध्येत राम मंदिर बनावे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते, हे स्वप्न नरेंद्र मोदींनी पूर्ण केले, असं एकनाथ शिंदे म्हणाले.