चंद्रकांत पाटलांच्या बाबरी मशिदीबाबतच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले,..
भाजपचं हिंदुत्व नेमकं आहे तरी काय?
मुंबई : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी अयोध्येतील बाबर मशीद पाडण्याबाबत शिवसेनेचा कोणताही संबंघ नसल्याचा मोठा दावा केला आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजप, शिंदे-फडणवीस सरकार आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, एका बाजूला मोहन भागवत मशिदीत जात आहेत. आता मदरशांमध्ये जाऊन हे कव्वाली ऐकणार आहेत. दुसरीकडे बाबरी आम्हीच पाडली म्हणून सांगणार आहेत. याचं हिंदुत्व नेमकं आहे तरी काय? मी सांगतो की, आमचं हिंदुत्व शेंडी जाणव्याचं नाही. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. तसं भाजपाने एकदा स्पष्ट करावं की, याचं नेमकं हिंदुत्व काय आहे?
आमच्याकडच्या मिंधेंनी सत्तेसाठी लाचार होऊन लाळघोटेपणा केला आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले असा आरोप करत भाजपाचे पाय चाटायला गेले. आता त्यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे, अन्यथा मिंध्यांनी स्वत: मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
मी अयोध्येला गेलो असताना, राम जन्मभूमीसाठी विशेष कायदा करा, असे म्हटले होते. मात्र मोदींनी ते धाडस केले नाही. राम मंदिराचा निकाल कोर्टाने दिला आणि हे बिळातंन बाहेर आलेले उंदीर हे त्याचे श्रेय घेण्यास पाहताहेत. एकूणच भारतीय जनता पक्षाची कीव करण्यासारखी गोष्ट आहे. लोकांनी विचार करायला हवा. अशा भरकटलेल्या लोकांच्या हातामध्ये आपला देश, आपलं भविष्य किती दिवस ठेवायचा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.