‘बाळासाहेब असताना मातोश्री मंदिर होतं, आता उदास हवेली’; मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल
मुंबई | शिवसेना शिंदे गटाचं कोल्हापूमध्ये महाअधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली. सगळ्यांना अयोध्येला घेऊन जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज शिवसेना आपण ताकदीने उभी करतो आहोत. शिवसैनिकांमध्ये उत्साह तळपतो आहे. आज मला समाधानही आहे की शिवसेना पक्ष पुढे जातो आहे आणि मोठा होतो आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याकडे आहे ही जमेची बाजू आहे. सत्यमेव जयते हे मी कायमच सांगत होतो. त्यामुळेच आपल्याला शिवसेना मिळाली आणि धनुष्यबाणही मिळाला. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याकडे तसाच महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वादही आपल्या पाठिशी आहे. आज जी काही गर्दी झाली आहे त्यामुळे शिवसेना कुणाची आहे हे सांगण्याची आवश्यकता राहिलेली नाही.
हेही वाचा – ‘शिरुरचा उमेदवार मीच असेल आणि मीच निवडून येणार’; शिवाजीराव आढळराव पाटील
बाळासाहेब ठाकरे आणि कोट्यवधी हिंदूंचं राम मंदिराचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केलं आपण त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावही सादर केला. आज आपण पाहतो आहोत जर बाळासाहेब ठाकरे असते तर राम मंदिर होताना, ३७० कलम हटताना त्यांनी पाहिलं असतं तर त्यांनी मोदींचं मुक्त कंठाने स्वागत केलं असतं आणि अभिनंदन केलं असतं. जे वारसा सांगतात त्यांनी एक शब्दही त्यांनी उच्चारला नाही. बाळासाहेबांचा वारसा, हिंदुत्व हे सांगण्याचा नैतिक अधिकारच तुम्हाला (उद्धव ठाकरे) नाही. ५० आमदार, १३ खासदार हे आपल्याकडे आहेत. नीलमताई आपल्याकडे आल्या आहेत. कितीतरी आमदार आपल्याकडे म्हणजेच शिवसेनेत आले आहेत. हजारो लोकप्रतिनिधी, जिल्हापरिषद आणि हजारो-लाखो शिवसैनिक का येत आहेत? असं ते म्हणाले.
माझ्याबरोबर ५० आमदार उभे राहिले. काहीही माहीत नसताना लोक माझ्याबरोबर ठामपणे उभे राहिले. आम्ही सत्तेतून पायउतार होण्याचा निर्णय आम्ही घेतला कारण आम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा विचार जिवंत ठेवायचा होता असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. रोज आमच्यावर आरोप करत आहात, तुमच्यावरची संकटं एकनाथ शिंदेंनी छातीवर झेलली आहेत. मातोश्री हे बाळासाहेब असताना पवित्र मंदिर होतं. आता ती उदास हवेली झाली आहे. आज तुम्ही कसं वागत आहात. मातोश्रीतून वाघाची डरकाळी ऐकू यायची तिथून आता रडगाणी ऐकू येतात, शिव्याशाप ऐकू येतात. रोज सांगायचं बाप चोरला, बाप चोरला. बाळासाहेब ठाकरे हे कुणा एकट्या दुकट्याची मक्तेदारी नव्हती. बाळासाहेब तमाम शिवसैनिकांसाठी दैवत होतं त्या दैवताचं पुण्यत्व तुम्ही विकलंत. सत्तेच्या मोहापायी आणि खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार आणि आचार सोडले. यांना मोह झाला आणि स्वार्थ झाला होता. नवा कार्यक्रम चुकीचा आहे हे तेव्हाच सांगितलं होतं, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.