“हिंदू धर्माची शक्ती संपवण्याची ताकद त्यांच्याकडे आहे का?” एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींना सवाल
मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी त्यांच्या भाषणांच्या माध्यमातून त्यांनी भाजपाप्रणीत राज्य सरकार व केंद्र सरकारवर परखड शब्दांत टीकास्र सोडलं. या सभेवरून आज दिवसभर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांना खोचक शब्दांत लक्ष्य केलं.काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता रविवारी संध्याकाळी मुंबईत झालेल्या सभेने झाली. यावेळी उद्धव ठाकरे, एम. के. स्टॅलिन, फारुख अब्दुल्ला अशी महाविकास आघाडीतील मोठी नेतेमंडळी उपस्थित होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रविवारी झालेली सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग असल्याचं म्हटलं आहे. “कालची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग होती. भानुमती का कुणबा, कहीं से इंटे, कहीं से रोडे अशी म्हण आहे. सगळे नैराश्य चेहऱ्यावर असलेले लोक तिथे होते. उत्तर प्रदेश, बिहारमधून तडीपार, हद्दपार झालेले लोक तिथे आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की पकडून आणलेले लोक तिथे होते. हे दुर्दैवी आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, यावेळी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांना लक्ष्य केलं. “स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व बाळासाहेबांच्या स्मारकासमोर ही सभा झाली. उबाठाच्या लोकांनी आधी त्या समाधीवर जाऊन माफी मागायला हवी होती. सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्यांबरोबर, सनातन धर्माचा अवमान करणाऱ्यांबरोबर बसावं लागतंय. फारूख अब्दुल्लांबरोबर बसावं लागतंय. त्यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे”, असं ते म्हणाले.
हेही वाचा – महाविकास आघाडीत ठाकरे गटाला २२ जागा? वाचा संपूर्ण यादी
“काल उद्धव ठाकरेंचा एक शब्द बंद झाला. ‘माझ्या तमाम हिंदू बांधव-भगिनींनो’. यावरून लक्षात आलं की बाळासाहेब ठाकरेंचे विचार, त्यांची भूमिका, धोरण हे सगळं त्यांनी सोडलं आहे. म्हणून तर आम्हाला त्यांना सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. अब की बार, तडीपार असं काल दिसत होतं. इतर राज्यांतून तडीपार झालेले लोक मोदींना तडीपार कसं करू शकतात?” असा खोचक सवाल एकनाथ शिंदेंनी केला.
“राहुल गांधींनी ‘हिंदू धर्माची शक्ती’ असा उल्लख केला आहे. हिंदू धर्माची शक्ती समाप्त करण्याची ताकद आहे का त्यांच्याकडे? याचं उत्तर जनता त्यांना येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवेल. हिंदू धर्माची शक्ती संपवणारा अजून जन्माला आलेला नाही. एवढा मोठा राष्ट्रीय नेता, पण ठाण्यातल्या सभेला ५०० लोकही नव्हते. फ्लॉप शो झाला. मुंब्र्यात तर ४-५ लोकही नव्हते. सगळ्या गाड्या होत्या. एक नेता तर कुणालातरी मारतही होती गर्दी झाली नव्हती म्हणून”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
“उद्धव ठाकरेंना ५ मिनीट भाषण करायला दिली. यावरून त्यांची पत कालच्या सभेत दिसली. आता त्यांच्याकडे आमदार, खासदार, शिवसेना नाहीये. त्यामुळे त्यांच्या ताकदीप्रमाणे त्यांना वेळ दिली”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.