नीलन गोऱ्हे आणि मनिषा कायंदे यांना अपात्र करा; ठाकरे गटाची मागणी
मुंबई : विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काही दिवसांपुर्वी शिंदे गटात प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या पावसाळी अधिवेशनाची वादळी सुरूवात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानपरिषदेत मंत्र्यांचा परिचय करून दिल्यानंतर नीलम गोऱ्हे यांच्या उपसभापतीपदावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे.
अनिल परब म्हणाले की, विधानपरिषदेच्या उपसभापती म्हणून नीलम गोऱ्हे काम बघत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वत:हून पक्षाचं सदस्यत्व सोडलेलं आहे. दहाव्या परिशिष्टातील कायद्याच्या २ अ मध्ये अपात्रतेची तरतूद आहे. त्याअंतर्गत आम्ही त्यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे.
हेही वाचा – Pune : जुन्नरमधील टोमॅटो उत्पादक शेतकरी झाला कोट्याधीश
सर्वोच्च न्यायालयात अपात्रतेचा निर्णय काय झालाय हे सगळ्यांना माहिती आहे. न्यायालयाने ही सगळी प्रकरणं अध्यक्षांकडे पाठवली आहेत. पण सध्याच्या परिस्थितीत सभापती नाहीयेत. उपसभापतींवरच अविश्वासाचा ठराव आहे. म्हणून आम्ही त्यांना पदावरून हटवण्याचीही नोटीस दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात नबाम राबिया प्रकरणातील दाखला देत स्पष्ट केलं गेलंय की ज्यावेळी सभापती-उपसभापती पदावर अविश्वास दाखवला जातो, त्यावेळी त्या सदस्याला खुर्चीवर बसवण्याचा कायदेशीर वा नैतिक अधिकार नाही, असं अनिल परब म्हणाले.
जोपर्यंत अपात्रता याचिकेचा निर्णय लागत नाही, पदावरून दूर करण्याच्या नोटीसबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत या सभापतींनी त्या खुर्चीवर बसू नये अशी आम्ही भूमिका घेतली. आमची भूमिका न मांडू दिल्यामुळे आम्ही सभात्याग केला. हे सरकार संख्याबळावर माजलंय. उपसभापती त्यांना पूर्णपणे मदत करत आहेत. आज बहिष्काराचा निर्णय झालाय. आता मविआच्या बैठकीत पुढची दिशा ठरवली जाईल, असंही अनिल परब म्हणाले.