दिशा सालियान : आदित्य ठाकरे जितके बोलतील, तेवढते फसतील : आमदार नितेश राणे
नागपूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियान प्रकरणात जेवढे तोंड उघडतील,तेव्हढे ते फसत जातील, अशी टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला जात आहे. याबाबत ठाकरे यांनी बोलताना सांगितले होते की, दिशा हिचा मृत्यू झाला. त्यावेळी माझे आजोबांचे निधन झाले होते. मग, त्या घटनेच्या दिवशी मी तिथे कसा असेन? असा प्रश्नही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला.
यावर आमदार नितेश राणे यांनी पटलवार केला आहे. दिशा सालियानचा खून दि. ८ जूनला झाला आहे आणि दि. १४ जून २०२० रोजी आदित्य ठाकरे यांचे आजोबा स्व. पाटणकर यांचे निधन झाले आहे. पण, आदित्य ठाकरे सांगतात की, दिशाचा मृत्यू झाला. त्यावेळी माझ्या आजोबांचे निधन झाले होते. मग, मृत्यू झाला, त्यावेळी मी तिथे कसा असेन? याचा अर्थ आदित्य ठाकरे खोटं बोलत आहेत.
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात एसआयटीच्या माध्यमातून चौकशी होणार आहे. संबंधितांचे कॉल रेकॉर्ड आणि चॅटिंगची तपासणी होईल. मात्र, आदित्य ठाकरे यांचे नाव कुणीही सभागृहात घेतले नाही. पण, तरीही आदित्य ठाकरे प्रसारमाध्यमांसमोर येवून सांगतात की, ३२ वर्षाच्या तरुणाची राजकीय कोंडी करण्यासाठी सरकार सर्व ताकद लावत आहे. याचा अर्थ आदित्य ठाकरे स्वत:च या प्रकरणात संबंधित असल्याचा खुलासा करीत आहे. अन्यथा ठाकरे यांनी चौकशीबाबत बोलण्याची आवश्यकताच नाही. जी चौकशी असेल, ती होईल. सत्य बाहेर येईल, असेही आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे.