काँग्रेसचा जाहीरनामा देशद्रोह्य़ांना खुश करणारा
केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांची टीका
नागपूर : काँग्रेसचा जाहीरनामा देशद्रोह्य़ांना खुश करणारा आहे, अशी टीका केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी येथे केली.
जगनाडे चौकातील रजिंटा हॉटेलमध्ये आयोजित भाजपच्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कांचन गडकरी, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, महापौर नंदा जिचकार, माजी महापौर अर्चना डेहनकर आदी यावेळी उपस्थित होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्याला ‘सर्जिकल’ व ‘एअर स्ट्राईक’ने उत्तर देत असताना दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष देशद्रोहाला अपराध मानण्यास नकार देतात. यासंदर्भातील कायदा नाहीसा करण्याची भाषा करतात. एकीकडे काँग्रेस देशप्रेम दाखवते आणि दुसरीकडे त्यांच्या फायद्याचे बोलते. चौकीदार आणि राजपुत्रात हाच फरक आहे, असे त्या म्हणाल्या.
निर्णयक्षमता काय असते हे उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर दिसून आले. यापूर्वी मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला फक्त पत्र पाठवण्यात आले होते याकडे त्यांनी लक्ष वेधले.