‘छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास स्वामी यांनी घडवलं’; योगी आदित्यनाथांचं विधान चर्चेत
आळंदी | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आळंदीत सुरू असलेल्या गीता-भक्ति अमृत महोत्सवाला उपस्थिती लावली. यावेळी योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरेटोप घालून सत्कार करण्यात आला. यावेळी आमचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांशी आहे, मुघलांशी नाही, असा सणसणीत टोला लगावला. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास स्वामी यांनी घडवलं, असं वक्तव्य त्यांनी केलं.
योगी आदित्यनाथ म्हणाले की, मला आज पावन आळंदी भूमीत येण्याचं सौभाग्य लाभलं. मी सनातन धर्मासाठी काम करत आलेलो आहे. आज ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमीला नतमस्तक करतो. अगदी लहान होते तेव्हा ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचली. तेव्हापासून आळंदीत येण्याची इच्छा होती. ती आज पूर्ण झाली आहे.
हेही वाचा – आळंदीतील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली, मोकळा श्वास कधी घेणार?
महाराष्ट्रात एकाच कुटुंबात चार संत होऊन गेले. त्यांचा आशीर्वाद आपल्याला शेकडो वर्षांपासून मिळतो आहे. याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांना रामदास स्वामी यांनी घडवलं. त्यांनी औरंगजेबच्या सत्तेला आव्हान दिले. औरंगजेबला असे मारले की आजपर्यंत औरंगजेबला कोणी विचारलं नाही. महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे. कारण इथं संतांचं सान्निध्य आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.