#Covid-19: पालघर जिल्ह्य़ातील उपचाराधीन करोना रुग्णसंख्या अडीच हजार पार
- वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात एक हजार ७३१ रुग्ण
पालघर |
पालघर जिल्ह्यातील सक्रीय करोना रुग्णसंख्या दोन हजार ६३४ इतकी पोहोचली असून त्यापैकी एक हजार ७३१ रुग्ण वसई—विरार महानगरपालिका क्षेत्रात तर ९०३ रुग्ण जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नोंदवण्यात आले आहेत. या आजारामुळे मृतांची संख्या आतरपत एक हजार २२३ इतकी झाली असून त्यापैकी ३११ ग्रामीण भागातील आहेत. जिल्ह्याचा मृत्यूदर १.८२ इतका असून गेल्या २४ तासात जिल्ह्यात २३२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांत करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असून सद्यस्थितीत ग्रामीण भागांमध्ये ९०३ जण करोनाबाधित आहेत. त्यापैकी ५६२ रुग्ण पालघर तालुक्यातील आहेत. त्याचबरोबरीने डहाणू तालुक्यात १०४, जव्हार १००, वसई ग्रामीण पट्टय़ात ४२, वाडा ३८, मोखाडा २९, तलासरी २३ आणि विक्रमगड तालुक्यात पाच रुग्णांचा समावेश आहे.
या रुग्णांपैकी ६७६ रुग्ण गृह विलगीकरण पद्धतीने उपचार घेत असून विक्रमगड येथील रिवेरा रुग्णालयात ६२, वाडा येथील आयडियल रुग्णालयात ३८, बोईसर येथील टीमा रुग्णालयात २८, पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात ११ तर डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयात सात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या दाखल रुग्णांपैकी १४४ रुग्णांना प्राणवायूची गरज नसून ४६ रुग्णांना प्राणवायू पुरवठा केला जात आहे. त्याखेरीज ३७ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल असून एकही रुग्णाला सध्या व्हेंटिलेटर वर नसल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात दिसून आले आहे.जिल्ह्यामध्ये असलेल्या नऊ समर्पित कोविड रुग्णालयांमध्ये (डीसीएच) ७८३ रुग्णांची क्षमता आहे. त्यामध्ये सद्यस्थितीत ९४ रुग्ण दाखल झाले आहेत.
जिल्ह्यातील दहा कोविड आरोग्य केंद्रांमध्ये (डीसीएचसी) मध्ये ५९१ रुग्ण दाखल करण्याची क्षमता असून त्यामध्ये ५९ रुग्ण दाखल आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील २२ कोविड केअर केंद्रामध्ये ७३० रुग्ण दाखल करण्याची क्षमता असून सद्यस्थितीत ८१ रुग्णांना तीन केंद्रांमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कोविड केअर केंद्रांपैकी जव्हार आयटीआय येथे ६३, डहाणू तालुक्यातील वेदांत वैद्यकीय महाविद्यालयात १३ तर पालघर नगरपरिषदेच्या पूनम पार्क येथील केंद्रात पाच रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. गृह विलगीकरणाची सुविधा नसलेल्या नागरिकाने कोविड केअर सेंटर मध्ये दाखल व्हावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. शिवाय आर टीपीसीआर चाचणी केल्यानंतर गृह विलगीकरण करणे आवश्यक असून अशा संभाव्य रुग्णांनी किंवा आजाराची लागण होऊन गृह विलगीकरण सुविधा घेणाऱ्या रुग्णांनी नियमांचे उल्लंघन केल्यास अशा रुग्णांना कोविड केअर केंद्रांमध्ये भरती केले जाईल असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
वाचा- रावेत शिंदेवस्ती परिसरात फिटनेस 2 स्पोर्ट्स जिमच्या वतीने रक्तदान शिबीरास तरुणांचे प्रोत्साहन