#Covid 19 : पिंपळे सौदागरमधील नागरिकांनी आपापसात ‘Social Distancing’ ठेवावे
– नागरिकांना अत्यावश्यक सेवा मिळत नसल्याची खंत
– प्रशासनाने कडक भूमिका घ्यावी, अन्यथा परिणाम वाईट होतील
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
सर्वत्र करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून सरकारणे संचारबंदी लागू केली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा कार्यरत ठेवल्या आहेत. तरी, काही व्यावसायिक नागरिकांना सेवा उपलब्ध करून देण्यात हलगर्जीपणा करत असल्याचे दिसून येत आहे. व्यावसायिकांनी नागरिकांना या सेवा प्राधान्याने द्याव्यात. नागरिकांनीही घराबाहेर पडल्यावर स्वत:च्या सुरक्षेसाठी ‘Social Distancing’ चा अवलंब करावा. संपूर्ण परिसर निर्जंतुक करण्यासाठी पालिका प्रशासनाने पिंपळे सौदागर प्रभागासह शहरात औषध फवारणी करावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप काटे यांनी केले आहे.
करोनाचे संकट वाटते तेवढे सोपे नाही. देशभरात संचारबंदी लागू आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सुध्दा हिच परिस्थिती आहे. प्रशासकीय यंत्रणा दिवसरात्र आपल्या सुरक्षेसाठी झटत आहे. पोलीस बांधव रणरणत्या उन्हात रात्री उशिरापर्यंत बंदोबस्त पुरवत आहेत. तरी देखील काही नागरिकांकडून त्यांना सहकार्य होत नसल्याची परिस्थिती आहे. आपल्या पिंपळे सौदागर भागात सोसायट्यांचा परिसर आहे. याठिकाणी उच्चशिक्षित लोकांचे राहणीमान आहे. परंतू, पोलिसांना याच भागात येऊन नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करावे लागत आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. तरी, नागरिकांनी स्वत:च्या व कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या सुरक्षेसाठी स्वत: काळजी घ्यावी, अशी सूचना संदीप काटे यांनी केली आहे.
नागरिकांसाठी बाहेर अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहेत. तरी नागरिकांनी संय्यम बाळगून सुरक्षित अंतर ठेवावा. अत्याश्यक सेवा न पुरविणाऱ्या व्यावसायिकांवर प्रशासनाने कारवाई करावी. कोणत्याही परिस्थितीमध्ये नागरिकांना सेवा उपलब्ध झाली पाहिजे. पिंपळे सौदागर भागात राहणाऱ्या लोकांना किराणा माल, दुध, सिलिंडर, फळे, पालेभाज्या अशा वस्तू घरपोच मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहेत. अशा व्यावसायिकांवर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी. तसेच, नागरिकांनी सरकारच्या पुढील आदेशापर्यंत आपल्या घरातच थांबावे. इतरांचा सहवास टाळावा. बाहेरून घरी आल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत, असेही काटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पिंपळे सौदागर भागात मोठ्या प्रमाणात सुशिक्षित नागरिक राहतात. नोकरी, व्यवसायानिमित्त त्यांचा बाहेरील नागरिकांशी संपर्क आलेला आहे. तरी, या भागातील कानाकोपऱ्यात पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने निर्जंतुकीकरण फवारणी करावी. आयुक्तांनी स्वत: लक्ष घालून आदेश द्यावेत.
संदीप काटे, कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस