Covid-19 च्या रुग्णांसाठी व्हेंटिलेटर आवश्यक का आहे? त्याची गरज कधी पडते?
करोना व्हायरसच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे भारताने व्हेंटिलेटर्सच्या निर्यातीवर बंदी घातली असून, परदेशातून नवीन व्हेंटिलेटर्स खरेदी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आज जगभरातून व्हेंटिलेटर्सना मागणी आहे. पण करोना व्हायरसच्या आजारामध्ये व्हेंटिलेटर्सची इतकी आवश्यकता का आहे?
जेव्हा तुमची फुफ्फुसं व्यवस्थित काम करत नसतात तेव्हा, श्वासोश्वास सुरु ठेवण्यासाठी व्हेंटिलेटर तुम्हाला मदत करते. फेसमास्कच्या माध्यमातून ऑक्सिजन तुमच्याशरीरापर्यंत पोहोचवते. करोना व्हायरसची लागण झालेल्या प्रत्येक रुग्णाला विशेष औषधोपचारांची गरज भासत नाहीय. ते रुग्ण विशेष उपचारांशिवायही बरे होत आहेत. सहापैकी एका रुग्णामध्ये करोनाची गंभीर लक्षणे दिसून येत आहेत. त्या एका रुग्णाला श्वासोश्वास करताना समस्या आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार वृद्ध आणि आधीपासूनच अन्य आजार असलेल्या रुग्णांना जास्त धोका आहे. Covid-19 रुग्णांच्या फुफ्फुसामध्ये जेव्हा पाणी जमा होतं आणि ऑक्सिजन पुरवठयाला अडथळा निर्माण होतो, तेव्हा व्हेंटिलेटरची गरज भासते. सध्या भारतामध्ये तीस ते ५० हजार व्हेंटिलेटर आहेत. पण करोनाच्या रुग्णांची संख्या वाढले तेव्हा, दहा लाख व्हेंटिलेटरची गरज भासेल असे सीडीडीइपीने म्हटले आहे. मारुती, महिंद्र या वाहन निर्मिती क्षेत्रातील अनेक कंपन्या आता व्हेंटिलेटरची निर्मिती करणार आहेत. युनायटेड किंगडमध्ये फॉर्म्युला वनच्या कंपन्या व्हेंटिलेटर्स बनवणार आहेत.