#CoronoVirus:जालना जिल्हा कोरोनामुक्त, दोन्ही महिलांचे अहवाल निगेटिव्ह
जालना : राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना जालन्यातून एक दिलासादायक बातमी पुढे येत आहे. जालन्यातील शेवटचा कोरोना रुग्णही बरा झाला आहे. त्यामुळे आता जालना जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे.
जालन्यातील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दोन्ही महिलांचे अहवाल दुसऱ्यांदा निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा सरकारी रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह म्हणून उपचार घेत असलेल्या या दोन्ही महिलांचे प्रयोग शाळेकडून प्राप्त झालेले अहवाल पुन्हा निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांनी दिली.
जालना शहरातील दुःखी नगरातील 65 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. तर, चार दिवसांपूर्वी परतूर तालुक्यातील शेलवडा येथील 39 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे औरंगाबाद येथील प्रयोग शाळेकडून प्राप्त अहवालानंतर स्पष्ट झाले होते. दुःखी नगर मधील महिलेचे प्रथम तीन अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यानंतर चौथा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त केले जात होते. मात्र, त्यानंतर प्रयोग शाळेकडून दुःखी नगर भागातील या महिलेचा अहवाल तीन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे प्रशासनासमोरील चिंता वाढली होती.
त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा या महिलेसह परतूर तालुक्यातील शेलवडा येथील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या महिलेचा अहवाल प्रयोग शाळेकडून निगेटिव्ह आला, अशी माहिती राठोड यांनी दिली. मात्र, खबरदारी म्हणून जिल्हा रुग्णालयाच्या वतीने या दोन्ही रुग्णांच्या लाळेचे नमुने शनिवारी सकाळी पुन्हा प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. या चाचणीचा अहवालही निगेटिव्ह आला. त्यामुळे आता जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नाही.